गुरुवार, १९ जानेवारी, २०१७

ग्रेसांची इंग्रजी दुर्बोधता !
कवी ग्रेस ह्यांचे इंग्रजीही मराठीच्याच उंचीचे होते व अगदी सम-भावाने त्यांनी इंग्रजी कवितातही दुर्बोधता पेरून ठेवली असावी. ही काही समीक्षा नसून समजण्याच्या वाटेला आलेले भागधेय म्हणावे लागेल. उदाहरणार्थ ही कविता पहा:
( सांध्यपर्वातील वैष्णवी मधून पृ : १९६)
अवकाश, अरबी मुली आणि तुर्की मुले 


Physical form
of your troeling
and divine
hysteria of rhetoric
in your soul
is now sleeping like an
exhausted, motherless child.
Do you remember the
hunted death of that
trecherous, crimson, wise
bird ? Whose body was
never brought to it’s grave;
retriever had only a saffron
feather…
मोठ्या साहित्यिकाला त्याच्या लिखाणातल्या स्पेल्लीन्गच्या चुका काढल्या तर स्वाभाविकच राग येतो. पण एकवेळ स्पेलिंग चुकले तर आपण ते अंदाजाने सुधारून घेवून तसे वाचून अर्थाजवळ जाऊ शकतो. पण छापलेला शब्द जर कुठे नसलाच तर त्याचा अर्थ तरी कसा निघायचा ?
Troeling असा काही शब्दच इंग्रजीत नाहीय तेव्हा त्याचा अर्थ तरी कसा असणार ? जर जुन्या परंपरेने पद्याची फोड केली तर Physical form of your troeling and divine hysteria of rhetoric in your soul is now sleeping like an exhausted, motherless child ह्या वाक्याचा अर्थ troeling ऐवजी being ठेवले तर बरोबर निघतो तो असा: Physical form of your being and divine hysteria of rhetoric in your soul is now sleeping like an exhausted, motherless child. खरे तर भाषाशास्त्रात अर्थ हा वाक्याने येतो, पण इथे हा आडमुठा शब्द जाम अर्थाला जवळ फटकू देत नाही !
----------------------------------

बुधवार, १८ जानेवारी, २०१७


एक लोणकढी

कवी ग्रेस हे फार चोखंदळ कवी. सहसा त्यांचे शब्द चूक नसतात. अजब असतात व ते शोधावे लागतात. पण कधी कधी त्यांचे चुकते की छापणाऱ्यांचे हे कळायला मार्ग नसला तरी कळण्याची गोची होते.


आता हे कडवे ( सांध्यपर्वातील वैष्णवी, बकुळा, पृ: १२७)पहा :

प्रत्येक गढीवर कढी

ही पद्मकळ्यांची चित्रे

पाताळघरातुन हिजला

येतात कुणाची पत्रे

-----------------

गढीवर कुठे कुठे चहा पिणारी मंडळी दिसतात पण ते कढी पीत असतील फारच असंभव. खालच्या ओळीत पद्मकळ्यांची चित्रे आहे, तेव्हा ती ही प्रत्येक गढीवर चित्रे काढी हे समजायला सहज जावे. पण कढी ?

--------------------

आता ही कवीची लोणकढी की आपल्या समजुतीच्या कढीला आलेला ऊत की अर्थ काढताना समीक्षकाला ज्या कळा येतात त्याने पातळ होणारी कढी ?

बुधवार, ११ जानेवारी, २०१७

एका वास्तवाचा दंश !
कविता-रती, दिवाळी २०१६ मधून
शेषांग   ( कवी : दत्तप्रसाद दाभोळकर )
मनापासून
“या”
म्हणत नाहीत.
उघडपणे
“जा”
म्हणत नाहीत.
खरंच
मुले आता मोठी झालीत !

एका अतिशय छोट्या कवितेत एका वास्तवाचा प्रचंड दंश करणारी ही कविता आहे. ह्यात आजकाल मुले मोठी झाली की आई-बापांबरोबर कशी वागतात, मनापासून या म्हणत नाहीत व लाजे काजे जा म्हणत नाहीत हे वास्तव मांडलेले आहे.
सगळ्यात बहार म्हणजे ह्या कवितेचे शीर्षक, जे आहे शेषांग ! शेष म्हणजे सर्पांचा राजा व त्याचे अंग म्हणजे मुले. साध्या भाषेत म्हणता येईल, सापाची अवलाद ! इथे केवळ मुलांनाच नावे नाहीत तर आईबापांनाही ! व्वा ! व्वा !
------------------------


  

बेपत्ता ( कवी : दासू वैद्य कवितारती दिवाळी २०१६)


बेपत्ता 
( कवी : दासू वैद्य , कवितारती दिवाळी २०१६ मधून)
-----––----------------------

वातावरणात

कविता पसरलेली

रसिकांसमोर

कविता वाचतोय कवी

 

वेळेसोबत मैफल रंगत गेली

घरातले-मनातले

गडद होत गेले संसार

परिणामी उपस्थितांच्या मनात

वाढत गेली चुळबुळ

 

कवी मनकवडा

ओळखला रागरंग

केली घोषणा

शेवटच्या कवितेची,

लोकही सावरून बसले

ऐकायला भैरवी

 

कवी शोधू लागला भात्यात

शेवटचा बाण

उलटू लागला पानं

शोधू लागला कविता,

उपेक्षित कविता काही

लवकर सापडेना

 

“आत्ता समोरच्या अंगणात तर

होती खेळत ”

अशा भरोशावर

पुन्हा पुन्हा उलटतोय पानं

अनुक्रमणिकेच्या झरोक्यातून

पाहतोय कविता

पुढ्यातले दोन-तीन कवितासंग्रह

काढले धुंडाळून

 

लोक पाहतायत

स्वतःची कविता शोधताना

अस्वस्थ झालेला कवी

जत्रेत हरवलेल्या

लेकराच्या बापासारखा

कवीचा चेहरा,

एकदा चष्मा घालून

एकदा चष्मा काढून

उलटली पुस्तकांची पानं,

घामाघुम कवीला पाहून

रसिक विसरले क्षणभर

घरी जायला झालेला उशीर.

 

कवी उलटतोय पानं

शोधतोय कविता

कविता मात्र सापडत नाहीये.

 

तशी एरवीही

कवीला अपेक्षित कविता

बेपत्ताच असते

संग्रहातून.

 

इथे एका गंमतीदार प्रसंगावर दासू वैद्य ह्यांनी एक कविता केली आहे. एका काव्यगायनात कवीला त्याचीच एक कविता सापडत नाही व त्यावरून कवी म्हणतो की नाही तरी कवीची अपेक्षित कविता ही संग्रहातून बेपत्ताच असते. ही काही प्रासंगिक गंमत नाही, तर कवी, त्याची म्हणता येईल अशी कविता, व कवितेचे असणे अशा सखोल विषयावरचे हे न केलेले भाष्य आहे.

कवी ग्रेस म्हणत की एकदा कविता केली की ती व कवी ह्यांची नाळ तुटते व तिला तिचे स्वतंत्र अस्तित्व येते. ( पण प्रत्यक्षात ते कवीचे नाव उद्धृत करण्याबद्दल अतिशय दक्ष असत ते सोडा.). कवितेचा अर्थ समीक्षकांना एक समजतो तर वाचकांना ज्याच्या त्याच्या मगदुराप्रमाणे वेगवेगळा समजतो. त्यामुळे संग्रहात असलेली कविता ही त्या कवीची का वेगळीच ? आधुनिक कवितेचे जनक कवी बा.सी. मर्ढेकर ह्यांनी एकदा एक कविता, “ह्या गंगेमधि गगन वितळले ” नावाची, मौज मासिकाला पाठविलेली होती. साक्षेपी संपादक श्री. पु. भागवताना ती महात्मा गांधीवरची वाटली व तशी ती त्यांनी गांधी विशेषांकात छापली पण. पण नंतर कवींनीच त्यांना सांगितले की ती गांधींवर नव्हती. मग श्री पु ची गांधीवरची कविता कुठे गेली ?

कवितेपेक्षा उच्च कोटीची कला आहे, चित्रकला. त्यात तर इतक्या नकला होतात की एकदा प्रसिद्ध चित्रकार एम एफ हुसेन ह्यांची अनेक नकली चित्रे त्यांना दाखविण्यात आली व जेव्हा विचारले की ही असली आहेत का तर ते सांगू नाही शकले, इतकी ती हुबेहूब होती. खुद्द दासू वैद्य ह्यांनी नव्या तुकाराम चित्रपटात जी गाणी लिहिली आहेत ती आज स्वतः तुकाराम महाराज आले तर त्यांनाही ती त्यांची का कोणाची हा भ्रम पडेल. ( जुन्या चित्रपटातले एक गाणे “आधी बीज एकले ” हे गाणे मला तुकाराम गाथेत सापडले नाही कारण ते शांताराम आठवले ह्यांनी लिहिलेले होते. ).

कविता विषय हाच मुळी संग्रहाबाहेर असतो. कवितेची उर्मी हीसुद्धा बाहेरच वसत असते. त्यामुळे अपेक्षित कविता संगरातून बेपत्ता असते हे कवीचे म्हणणे रास्तच आहे. त्यामुळेच तर स्वतः तुकाराम महाराज म्हणतात :

करितों कवित्व ह्मणाल हें कोणी । नव्हे माझी वाणी पदरींची ॥1॥

माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । मज विश्वंभर बोलवितो ॥ध्रु.॥

काय मी पामर जाणे अर्थभेद । वदवी गोविंद तें चि वदें ॥2॥

निमित्त मापासी बैसविलों आहें । मी तों कांहीं नव्हे स्वामिसत्ता ॥3॥

तुका ह्मणे आहें पाइकचि चि खरा । वागवितों मुद्रा नामाची हे ॥4॥

 

----------------------------

मंगळवार, १० जानेवारी, २०१७

गोठवावे पाणी ( कवी : मधु जामकर )

गोठवावे पाणी

( कवी : मधु जामकर, कविता-रती दिवाळी २०१६ )
--------------------------------------

दारी पानझड

उडतो पसारा

मिटले आकाश

तेवढा सहारा

वळणावरचे

गळे आवसान

मागे पुढे श्वास

सुटते अवधान

मोजतो आकडे

उलटे सुलटे

घोकतो जगणे

बोचताना काटे

डोळ्याची अंधारी

पुढचे दिसेना

आणखी उसासे

पाऊल सजेना

आता आहे घाई

दिवस यामिनी

ढवळून सारे

गोठवावे पाणी.
-----------

कवितेच्या पहिल्या ओळीतच “दारी पानझड”, म्हणून कवीने कविताभर येणाऱ्या, खिन्न करणाऱ्या, म्हतारपणीच्या, “एकेक पान गळाया...” ह्या मूडची चुणूक दाखविली आहे. आता कवीने कोणता मूड बाळगावा हा त्याचा प्रश्न असला तरी त्याने आपल्या कण्हण्याने माहोल कलुषित करावा ही काही चांगली नीती म्हणता यायची नाही. आता “पानझड” म्हणजे मरणच, असे निसर्गाचा दाखला देत म्हणावे हे विज्ञानाचे जितके अज्ञान, तितकेच ते अतिरंजित होते. पानझडीत पाने गळतात ती येणाऱ्या काळात पाण्याचे दुर्भिक्ष होणार आहे, तेव्हा अती पाणी शोषणारे अवयव, पाने, स्वखुशीने त्यागणे ह्या निसर्गाच्या धोरणाने असते. तो काही मरणाचा धाक नसतो. आता कवींना हे प्राथमिक विज्ञान भले माहीत नसले तरी नशीबाने तो पहिल्या कडव्यात आशावादी आहे तो आकाशामुळे. पाने गळतात, त्यांचा पसारा साचतो, पण तो आटोक्यात ठेवण्यासाठी मिटलेले आकाश आहे व त्याचा कवीला सहारा वाटतो. ह्या एव्हढ्याशा आशेवरून कविता पुढे धकते आहे.

खरे तर एकदा म्हातारपण आले की कसली येताहेत वळणे ? पण समजा एखाद्या कवीच्या जीवनात आली असतील वळणे, तर त्याला सामोरे न जाता, मागे पुढे श्वास होत, कवीचे अवधान गळते आहे. अवसान गळते आहे. परिस्थितीचे काटे बोचताना, तो जगणे घोकतो आहे. इथे ह्याच्या घोकण्याने त्याची जगण्याची लालसा आहे हे किंचित दिसते आहे. पण त्याला पुढचे दिसत नाहीये, अंधारी आली आहे ही द्विधा अवस्था इथे कवीने छान टिपली आहे.

आता कवीला घाई आहे. दिवस रात्र. ( यामिनी म्हणजे रात्र ). कसली ? तर आता पावेतो जे ढवळून काढले आहे ते पाणी गोठवण्याची.

इथे कवी निरवानिरव करतो आहे. पण कशी, तर गोठवण्याने. काय गोठवणे ? तर धडपडीचे, उसन्या बळाचे, पाऊल सजवण्याचे. ढवळण्याचे. म्हातारपणी सगळ्या उर्मी कशा नष्ट करू नयेत, तर गोठवून त्या सुप्त कराव्यात असा कवीचा होरा आहे. ह्या स्थितप्रज्ञ होण्याच्या युगतीने इथे कविता निराशात्मक न होता, उर्मी लपवण्याची ( गोठवून ) युगत सांगणारी होते.      

अति सोप्या सरळ शब्दात मांडणे असले, तरी काही ठिकाणी कवीने अप्रतीम अशी काव्यमय शब्दयोजना केली आहे, जीमुळे कविता खूपच उंची गाठते. पाउल धजणे, ऐवजी कवी इथे “पाऊल सजणे” वापरतो तेव्हा नाहीतरी आपण धीर धरताना आपल्या जीवाला आपण सजवतच असतो, नाही का ? असेच यामिनी . दिवस ह्या वसकन अंगावर येणाऱ्या शब्दाच्या बरोबर खरे तर आपण रात्र ( दिवस-रात्र ) हा शब्द बहुतेक करून वापरतो. पण इथे रात्र हा शब्द कवीला काव्यमय वाटला नसावा. याम म्हणजे प्रहर ( यामिक म्हणजे यांत्रिक/मेकॅनिक पणे , दिवसबरोबर रात्र न वापरता ) कवीने “यामिनी”योजावा हे कवीचे अप्रतीम शब्द्लाघव व काव्यमयता दर्शवते !

--------------------   

रविवार, २५ सप्टेंबर, २०१६

जानवी ---कवी सुरेश भट

“जानवी ” ----कवी सुरेश भट ( “एल्गार” मधून )

------------------ 

सांगा कुणीतरी या आकाशखाजण्यांना—

“मातीच मोक्ष देई कंगाल नागव्यांना !”

        आहे जरी उभा मी निष्पर्ण माळरानी

        या स्वप्नपाखरांच्या रोखू कसा थव्यांना ?

आली नव्या जगाची आली पहाट आली

आता उन्हात आणू पाळीव काजव्यांना !

        येती जरी समोरी सारे नकोनकोसे

        मीही नकोनकोसा झालो हव्याहव्यांना

साधाच मी भिकारी, माझी रितीच झोळी

गावात मान त्यांच्या श्रीमंत जोगव्यांना !

        प्रत्येक आतड्याचा मी पीळ होत आहे

        ते मात्र गाठ देती त्यांच्याच जानव्यांना !

----------------- 

प्रसिद्ध गझलाकार कै. सुरेश भट ह्यांच्या “एल्गार” ह्या काव्यसंग्रहातली ही गझल आहे.

गझल हे मात्रावृत्त असते. म्हणजे लघु अक्षराला एक आत्रा व दीर्घ अक्षराला दोन मात्र धरल्या तर सगळ्या ओळी त्याच क्रमाने मात्रेत याव्या लागतात. उदाहरणार्थ : सां गा कु णी त री या | आ का श खा ज व्यां ना || ह्याच्या मात्रा होतात : २,२,१,२,१,२,२ | २,२,१,२,१,२,२ . आता खालच्या सगळ्या ओळी ह्याच मात्रेच्या असाव्या लागतात. गझलेच्या प्रत्येक दोन ओळींना शेर म्हणतात व प्रत्येक शेर हा स्वतंत्रपणे स्वयंपूर्ण असावा लागतो. म्हणजे ह्या दोन ओळींच्या अर्थासाठी दुसऱ्या कोणत्या ओळींची गरज नसते व ह्या दोन ओळी/शेर हे स्वतंत्र एक कविताच असते. पहिल्या शेराच्या दोन्ही ओळी अंती यमक असते तर पुढच्या शेरात फक्त दुसऱ्या ओळी अंती यमक असते. एकेका शेरात संपूर्ण विषय संगाच्या असल्याने सांगणे प्रतीकांच्या सहाय्याने असते. हे सर्व ह्यासाठी लक्षात घ्यायचे की कवितेचा हा एक नजाकत भरा फॉर्म ( साचा ) आहे.  

आकाशाला, उच्च ध्येयाला, भिडून त्याला खाजवणारे असे आदर्शवादी लोक असा ‘आकाशखाजव्यांना’ चा अर्थ होऊ शकतो किंवा इंग्रजी स्कायस्क्रेपरचे सरधोपट भाषांतर करून गगनचुंबी इमारती असा अर्थ घेऊ शकतो. म्हणजे श्रीमंतांच्या गगनचुंबी इमारतींना कुणीतरी सांगायला हवे की जे भुके कंगाल, नागवे, गरीब लोक आहेत त्यांना आसरा, सहारा,व मोक्ष ही जमीन, मातीच देऊ शकते. इथे माती कसून कंगालांना सुटका, मोक्ष मिळू शकतो अशा अर्थछटेचीही शक्यता आहे.

निष्पर्ण माळरानावर काहीच आकर्षण नसल्याने पाखरे येणार नाहीत. पण ज्यांना स्वप्ने पाहायची आहेत अशांच्या स्वप्नपाखरांना, ते ही थव्याने येणाऱ्या, मी कसा रोखू शकेन ?

नव्या जगाची, प्रगतीची पहाट आली आहे. आता उन्हात आणूया पाळीव काजव्यांना. इथे पाळलेले काजवे अशासाठी की हुकुमाप्रमाणे हवे तिथे आपण त्यांना सोडून त्यांच्या मंद प्रकाशात वाटा धुंडाळू शकतो. इथे अर्थातच प्रगती असूनही, नव्या जगाची पहाट असूनही कुठे कुठे साचलेला अंधार आहे, तिथल्या लोकांना आपल्या वाटा शोधण्यासाठी हे काजवे आहेत.

प्रगतीच्या ह्या प्रकाशात नेमके जे नको नकोसे प्रसंग, लोक, आहेत, तेच हटकून सामोरे येतात. पण असे रोखठोक बोलण्याने माझ्या चाहत्यांनाही ( हव्याहव्यांना ) मी ‘नको नकोसा’ होतो आहे.

साधेच मागणे मागणारा मी साधाच भिकारी आहे. आणि म्हणूनच कोणी मला भीक घालत नाही व माझी झोळी ‘रीतीच ’ राहते. ह्या उलट देवीच्या नावाने मागणारे ( जोगवा मागणारे ) ह्यांना मान मरातबाची मदत व मोठेपणा मिळतो आहे.

जिथे जिथे दु:ख आहे, आतडे पिळवटून टाकणाऱ्या यातना आहेत त्या दु:खाला नुसतेच सामोरे नाही तर सहसंवेदनेने तो आतड्यांच्या वेदनेचा पीळ जाणवून मी वेदना पाहतो आहे. पण प्रस्थापित, प्रतिष्ठित लोक स्वतःच्याच बंधनात जखडलेले आहेत. जसे काही एखाद्या ब्राह्मणाने जानव्याला खुणेची गाठ द्यावी. इथे ‘जानवे’ हे वर्णभेदाच्या प्रतीकापेक्षा बंधनाचे प्रतीक आहे. म्हणजे ‘आहे रे ’ आणि ‘नाही रे ’यांच्या सनातन संघर्षात ‘नाही रे ’च्या वेदनेबरोबर कवीने सहसंवेदना, आतड्याचा पीळ होऊन जाणवावी तर ‘आहे रे ’नी स्वतःच्याच कपोलकल्पित बंधनात ( जानवी, अनेक जानवे ) राहून उगाच खुणेची गाठ बांधावी, करू काही नये, असे कवीचे वैषम्य आहे !

अरुण अनंत भालेराव

शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६

हि   कविता  . अगदी  पाठ झाली तर स्वर्ग दोन अंगुळे ,आणि नाही पाठ झाली तरी श्रीमंती कमी होणार नाही . आयच्यान !!

कोकण्या माणसाला गाता गळा लागत नाही . नुसते नाक असले तरी आमचे भागते .

<<<<<<<<<<<<<<<<<<<
त्या दिसा वडाकडेन
<<<<<<<<<<<<<<<<<<<

त्या दिसा वडाकडेन गडद तिनसाना
मंद मंद वाजत आयली तुझी गो पैंजणा

मौन पडले सगल्या राना
शिरशिरुन थांबली पाना
कवळी जाग आयली तणा झेमता झेमताना

पैसूल्यान वाजली घाट
दाटलो न्हयचो कंठ काठ
सावळ्यानी घमघमाट सुटलो त्याखीणा

फुलल्यो वैर चंद्र ज्योती
रंगध्रानी लागल्यो वाती
नवलांची जावक लागली शकुन लक्षणा

गळ्या सुखा, दोळ्या दुखा
लकलकली जावन थीका
नकळतान एक जाली आमी दोगाय जणा

वड फळांच्या अक्षदांत
कितलो वेळ न्हायत न्हायत
हुकलो कितलो चंद्रलोक इंद्रनंदना

तांतले काय नुल्ले आज
सगल्या जिणे आयल्या सांज
तरीय अकस्मात तुजी वाजती पैंजणा

कानसूलानी भोवतां भोवर
आंगर दाट फुलता चवर
पट्टी केन्ना सपना तीच घट्ती जागरना

त्या दिसा वडाकडेन गडद तिनसना
मंद मंद वाजत आयली तुझी गो पैंजणा
         __________ बा . भ . बोरकर