शनिवार, २९ ऑक्टोबर, २०११

------------------------------------------------------------------------------------------------

कविता म्हणजे.....(२)

एकपण ( कवी: ग्रेस , "सांजभयाच्या साजणी"-पॉप्युलर प्रकाशन, पृ.१५ )

माझ्या गात्रांत फुटले
उन्ह-कळ्यांचे तरंग
चार डोळ्यांनी झाकिले
तुझे माझे सारे अंग !
एका शब्दाने नभाला
नको करूस पोकळी
झाड तोडून घावांनी
केली सावली मोकळी....

---------------------------

कवी ग्रेस हे मराठी सारस्वतातले फार दबदबा असलेले कवी आहेत. गूढतेचे वलय ल्यालेले, तितकीच अप्रतीम शब्दकळा वृत्तातून प्रकट करणारे. ह्यांना कविता साक्षात "होतात", असा बोलबाला आहे.
झाड आणि झाडाची सावली ह्यांचे जसे "एकपण" असते व ते झाड तोडल्यावरच, झाड व सावली असे वेगळे होते, तसेच माझी गात्रे व त्यात नित्य उठणारे उन्हाचे, उत्साहाचे तरंग ह्यांचे "एकपण" आहे. तुझे दोन व माझे दोन अशा चार डोळ्यांनी आपण एकमेकांना पाहतो तेव्हा तुझे व माझे सारे अंग झाकून जाते, इतके आपले "एकपण" आहे. झाड जसे घावांनी तोडल्या जाते ( कुर्‍हाडीच्या घावांनी ) तसे आपल्यातले आभाळ ( आसमंत, नभ ) एखाद्या दुखावणार्‍या शब्दाने पोकळ करू नकोस, भेदू नकोस. आपले "एकपण" असेच असू दे. असा सरळ सोपा अर्थ असणारी ही छोटेखानी कविता आहे.
ग्रेस कवितेतली शब्दयोजना फार मोजून मापून करतात. साधारणपणे "तरंग" हे पाण्यावर "उठतात". कदाचित उमटलेले दिसतात. म्हणून वाक्‌प्रचार "तरंग उठतात" असा रूढ झाला असेल. पण गात्रात, इंद्रियात हे तरंग "फुटले" आहेत असे कवी म्हणतो. फुटण्याची क्रिया उस्फुर्त किंवा दैवीच म्हणायची. ह्या उलट "उठणे" हे कशाची तरी प्रतिक्रिया म्हणून होणारी क्रिया आहे. म्हणूनच भाव-भावनांचे स्फुरणे ह्याला कवी "माझ्या गात्रात फुटले, उन्ह-कळ्यांचे तरंग" असे म्हणून ते कुठल्यातरी अज्ञात संकेताने, उस्फूर्तपणे फुटलेले आहेत असे सांगतो. खरे तर हा कवी "संध्याकाळ"चा सदैव आगळेपणा मिरवणारा कवी आहे. पण इथे तो हे "तरंग", उन्ह-कळ्यांचे आहेत असे म्हणतो. "कळ्यांचे" हा शब्द योजून ही नुकतीच उमलणारी उन्हे आहेत असे कवी दाखवीत आहे. संध्याकाळच्या उदासीनतेचे हे कढ नसून नुकत्याच उमलणार्‍या उन्हासारखे, उत्साहाचे, हे तरंग भाव-भावनांचे, माझ्या गात्रात फुटत आहेत असे हे वर्णन होते.
पाहणार्‍याच्या डोळ्यात सौंदर्य असते ( "ब्यूटी इज इन द आय ऑफ बिहोल्डर ") असे म्हणतात. तसेच पाहण्याने म्हणजे डोळ्याने एखाद्या वस्तूचे सौंदर्य "उकलते", उलगडते. पण इथे कवी म्हणतो "झाकिले". तर ह्याचा अर्थ असा काढावा लागतो की मी तुला पाहतो तेव्हा माझे "मी-पण" मी झाकतो, तसेच तू मला पाहतेस तेव्हा तुझे "मी-पण" झाकल्या जाते. तर असे चार डोळ्यांनी आपण एकमेकांना पाहतो तेव्हा आपली अंगे झाकल्या जातात कारण ती इतकी एकमेकात एकपणाने आहेत. ह्याच बाबत आरती प्रभु एके ठिकाणी म्हणतात : "चार डोळे : दोन काचा दोन खाचा ". किंवा कुठल्या कुठल्या भूमिकेचा आपण चष्मा चढवलेला असेल तर मग जसे स्वत:चे अंग झाकल्यासारखे दिसत नाही, ज्या भूमिकेचा चष्मा असेल तसेच दिसते, असाही अर्थ "झाकिले"चा निघू शकतो.
कवीला आर्तपणाचे, उत्कटतेचे खूपच अप्रूप आहे. त्यामुळे हे "एकपण" असेच राहो, न दुभंगो, असे चिंतताना त्याला प्रतिमा सुचते ती झाड घावांनी तोडल्याने त्याची सावली झाडापासून तुटल्याची. झाड आणि सावली ह्यांचे "एकपण" जसे आहे तसे तुझे नि माझे नभ एकपणात आहे असेही कवी सुचवतो. व हे नभ एखाद्या घाव करणार्‍या शब्दाने पोकळ करू नकोस ( नभ तोडता येत नाही, ते पोकळ होऊ शकते ) अशी कवी इच्छा व्यक्त करतो. रासलीलेत जसे कृष्ण आणि गोपी ह्यांचे "एकपण" आपण कल्पितो तसे कवी इथे झाड सावली, गात्रे-भावभावना, तू-मी ह्यांचे "एकपण" चितारत आहे. ते छान जमून आले आहे.


--------------------------------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०११

कविता म्हणजे....(१)
-------------------------------------------------------------------
विपरीत : ( कवी : कविता म्हेत्रे , कविता-रती, मार्च-जून २०११)

नांगरणी करून
एके ओळीत समंजस
दाणे पेरताना
मायेच्या हातानं पाणी
पाजलेले
सुखद भोग
वाटयाला आले असते तर--
गाळून घेतलेल्या माझ्या
रक्तबीजांना
वाढायला हरकत कशाची होती ?

जिथं उगवणार नाही काहीच
अशा वांझ मातीत
पेरायचे अट्टाहास
आणखीन ठिसूळ होत जाताना,
वाया चाललेलं एक एक हंगाम
उरल्या जगण्याचं
अवसानही
काढून घेतात--
डोळे आकाशाला लावून बसलेली
मुळासकट करपलेली
ही बेहिशोबी झाडं.

पायाखालची ओली माती तरी
त्यांनी
शाबूत ठेवायची होती !
----------------------------------------

मार्च-जून २०११ च्या कविता-रतीतली ही एक कविता आहे. म्हणजे आत्ता आत्ताचीच.
नांगरून एका ओळीत पेरलेले दाणे, हे समंजस आहेत, ही एक अप्रतीम कवी कल्पना आहे. त्यांचा समंजसपणा एका ओळीत असण्याने तर आहेच, शिवाय ते योजलेल्या क्रियांवरून ( जसे खत देणे, पाणी देणे, वारा-ऊन वगैरे ) वाढतात ह्यात ज्यास्त आहे. त्यांना पाणी देऊन वाढताना जे सुखद भोग ( जसे नवे अंकुर येणे, कोंभाची चांगली वाढ होणे, झाडाचे तरारणे, फुले फळे येणे ) आहेत तसेच भोग माझ्या वाटेला ( माझ्या रक्तबीजांच्या वाटेला ) आले असते तर ? इथे कवयित्रीची काहीशी खिन्नता दिसते. रक्तबीज म्हणजे डिएनए किंवा व्यक्तिमत्वाची सुप्त बीजे असे धरले तर नक्कीच एक खंत व्यक्त केलेली आहे . जिथे काहीच उगवणार नाही अशा निराशेने वांझ जमीनीचे अवसानही काढून घेतात. झाडंही करपलेली आहेत. त्यांनी निदान पायाखालची जमीन तरी ओली ठेवायची होती ह्या सुप्त इच्छेने कवितेचा शेवट होतो.
कवयित्री जमीनीच्या वांझपणाबद्दल खंतते आहे की त्या दृष्टांताने स्वत:चे वांझपणाचे दु:ख काढते आहे हा संभ्रम मोठा धूसरपणे इथे पेरलेला दिसतो आहे. ( संभ्रमाला अंकुरायला कशाची ओल लागत नसावी, हे वाचकांचेच संचित म्हणायला हवे ! ). झाडे वाढलेली आहेत, शिवाय करपलेली आहेत, हाच त्यांचा बेहिशोबीपणा असावा. त्यांनी ह्या सगळ्या करपण्यात निदान पायाखालची जमीन तरी ओली ठेवायला हवी होती, हा सृजनाचा भरवसा देणारा आशावाद मात्र खूपच मोहक व बोलका आहे.
कवयित्री स्वत: शेतकी कामे करणारी आहे, का तिला शेतकर्‍यांच्या विश्वाचे सह-संवेदन आहे, हा तसा गौणच प्रश्न आहे. कवितेतले वांझपणाचे दु:ख व सृजनाची सूप्त आशा ह्या मात्र अगदी खुमासदारपणे साधलेल्या आहेत. कविता मुक्तछंदात असणे हे ह्या वृत्तीला पोषकच वाटते.

------------------------------------------------------------------------------------------------