सोमवार, १६ जून, २०१४

कविता म्हणजे

कविता म्हणजे
चंद्र आणि खेचर    ( कवी : दिलीप चित्रे )
चरतात एका फाळलेल्या माळावर
अंधार समजून गवत प्राणिमात्र ...
रात्रीत विरघळते माझे ढेकूळ
आसमन्त गढूळ करीत. पण मग स्वच्छ
होतात माझे डोळे पाहून उजळ
चंद्र आणि एक मुग्ध झालेले खेचर
स्वतःच्या सावलीवर ...
पाण्यात चांदण्याने रडलेलं अक्षर
मासोळीची लाटभर ओळ होऊन
पोह्तंय माझ्या गळक्या ढेकळाच्या
गढूळ आसमंतात ....अशी वेळ .
आणि गवत समजून स्वतःच्या सावलीचं
खेचर चांदणं चरतय ...
माझी माती बसते जाऊन रात्रीच्या तळाला
मासोळीच्या सुळकांडीची लाट पकडतो
प्रत्यक्ष अवकाशाचा गळ

चंद्र समजून मी पाहिलं
त्या मुग्ध खेचराचं चरणारं चांदणं.
------------------------------------------------------
लीम्बोणीच्या झाडामागचा चंद्र परिचित आहे पण खेचर ही काय भानगड आहे ? गाढव आणि घोडा ह्या प्रजातीतून निर्मिलेले  हे हायब्रीड जनावर . लष्करात ओझी वाहण्यासाठी वापरीत. माझ्या लहानपणी मी पाहिलेली खेचरं घोड्यापेक्षा दणकट असत आणि त्यांच्या पायावर केस असत. त्यांची शेपूट घोड्यापेक्षा जास्त झुपकेदार असे.  पण जे लोक घोड्यांची पैदास करतात ( रेसचे घोडे ) ते ह्या प्रजातीला खूप कमी लेखतात. त्याचा उल्लेख तिरस्काराने करतात.
तर अशा खेचरापैकी एक स्वतःच्या सावलीवरून स्वतःत मुग्ध झालेले आहे. स्वतःच्याच प्रतिमेत गुंग झालेले आहे. स्वतः कमजात असूनही स्वतःत मश्गुल झालेले आहे. हे म्हणजे आपलेच प्रतीक समजा. आपण आहोत गद्धेमजुरी करणारे पण आपण स्वतःलाच थोर समजतो आहोत.
तसे तर सगळेच प्राणीमात्र चरितार्थासाठी चरत असतात. दिवस आणि रात्र. अज्ञानाचा अंधार गवतासारखा चरात असतात. ह्या वैषम्यात कवीला अजूनही खालची जाणीव होते ती एक मातीचे ढेकूळ असल्याची. व हे ढेकूळ आजूबाजूचा आसमंतही प्रदुशित करते .
ह्या डीप्रेशन मध्ये जरा सुखाची बाब अशी की स्वतःत मश्गुल असलेले प्राणी ( जसे खेचर ) हे प्रणयी चांदणे चरत असतात.
स्वतःचे अस्तित्व अगदी ढेकळासारखे नगण्य असतानाही त्याच पाण्यातून वर उसळी घेणारी मासोळी ही जणू काही वरच्या अवकाशाने गळ टाकून वर खेचली आहे असे दिसते आहे. म्हणजे जे सुटकेच्या आशेने वर सुळकांडी घेतात तेही गळालाच लागलेले असतात.
तर अशा वेळी, मी काय पाहतो तर, स्वतःत मश्गुल झालेल्या माझे ( खेचराचे ) प्रणयात चरणे, चांदणं चरणे.

--------------------------------- 

शनिवार, १४ जून, २०१४



कविता म्हणजे
दिवे
काहीतरी कुजल्याचा वास याय लागला
अन मी खिशातनं रुमाल काढणार
तोच माझी करंगळी खाली पडली
ती मी दुसऱ्या हातानं उचलून घेतली
अन रुमाल नाकावर धरणार
तर नाकच निसटून रुमालात आलं
ते रुमालात गुंडाळून मी खिशात टाकलं

काहीतरी कुजल्याचा वास येतच होता
म्हणून खिशातल्या खिशात नाक मुरडलं
अन करंगळीत आळ्या पडल्यात की काय
ते बघणार ः पण तेवढ्यात दिवेच गेले

कवी -- अरुण कोलटकर.
कवीची पार्श्वभूमी, त्याच्या इतरत्र असलेल्या प्रतिमा वगैरे गोष्टींची आवश्यकता न मानता ह्या कवितेचा अर्थ लागणारा नाही का ? जे काही कवितेत लिहिलेय त्याचा काय होतो अर्थ ?
ज्यांनी महारोग्यांना जवळून पाहिलेय ( आजकाल हा रोग कमी झालाय पण जेव्हा ह्याचा प्रादुर्भाव होता तेव्हा प्रथम तोंडावर कानावर चट्टे येत असत. मग एकेक अवयव सडत जाई. विशेषतः बोटे आधी झडत असत. मग हात पाय असे अवयव जात. गॅन्गरीन झाल्यावर जशी बोटे, पाय कापावा लागतो तसेच महारोगात होते. बाबा आमटे ह्यांच्या आश्रमात तुम्ही काय काय वस्तू दान म्हणून घेता अशी विचारणा केली तर लोक सांगतात अहो एक चप्पल पण आम्ही घेतो, कारण आमच्या इथे बऱ्याच जणांना एकाच पाय असतो. असा हा भयंकर रोग आहे/होता. शिवाय हा संसर्गाने होतो अशा समजुतीने लोक अशा रोग्यांना शिवतही नाहीत. त्यामुळे महारोग झालेले रोगी एकाकी असणे अगदी संभवनीय.
तर अशा एका रोग्याने काही तरी कुजतेय त्याचा वास येतोय म्हटले तर त्याची परिस्थिती बरीच बिकट झालेली आहे हे कोणालाही कळावे. बोटे झडणे तर अगदी साहजिकच. त्यामुळे ह्याची करंगळी पडली तर त्यात काही असंभव वाटू नये. ह्या रोगात कशाचे वैषम्य वाटावे ? बोटे झडण्याचे का अवयव कुजून त्यांच्या वास येण्याचे इतकी ह्या रोगात परमावधी होते. त्यामुळे दुसऱ्या हाताने करंगळी उचलणाऱ्याला वास सहन न होऊन त्याने नाकाला रुमाल लावावा ह्यात केवढे कारुण्य ! शेक्सपियर जसे शेवटच्या अवस्थेचे वर्णन करताना “सॅन्स आईज, सॅन्स टीथ....” अशा एकेक अवयवाचे जाणे चितारतो तसे इथे ज्या नाकाला वास सहन होत नाहीय त्या नाकाचे जाणेही जवळ येतेच. आणि हे सगळे निर्विकार नजरेने त्याला पाहावे लागतेय. फार तर तो खिशातल्या खिशात त्यावर नाक मुरडू शकतो व मुरडतोही. महारोग्यांच्या शेवटल्या अवस्थेत जाखमात आळ्या पडतात व नंतर खेळच खलास होतो. त्यामुळे आसक्तीने आळ्या  पडल्या आहेत का ते पाहणे महारोग्याला भागच पडते . आणि ह्या आळ्या पाहण्यावर दिवे जाण्याने एक प्रकारे मेहेरबानीच होते. म्हणजे दिवे गेले ते बरेच ! मरणासन्न परिस्थितीतही आसक्तीचे हे असणे आणि त्यावर अनपेक्षित उतारा सापडणे हे मोठे काव्यमय वर्णन आहे. आसक्तीचा हा मरातब आहे का मरण्याचा हा महोत्सव आहे हे अनाकाल्नीयच राहते ते दिवे जाण्याने. असे दिवे गेले तर !

---------------------------------------------------

रविवार, १ जून, २०१४

दोन कविता, छे, दोन बायकी भूमिका
कविता-रती अनियतकालिकात आलेल्या ह्या दोन कविता पहा :
१)      कवितेच्या कळा   ( कवयत्री: संध्या रंगारी )
--------------------------
दाटून भरून आलय आभाळ,
मी शोधत होते मला, माझ्यातच
पण सापडत नाही मी, मलाच.
मी लिहू बघते कविता
उत्तररात्रीची,
गर्भातल्या प्रकाशाची.
तुफानातल सामर्थ्य अन सौंदर्यही
उतरतय इथ कागदावर
या नीरव शांततेत.
झरताहेत बोटातून शब्द,
ऐकू येतोय माझ्या आतला आवाज
अधिकच स्पष्ट
इतका की दचकते मी,
ऐकत तर नाही ना कोणी...?
दारात फुललीय रातराणी,
उरी वादळ .
मी रचतेय नवी सृष्टी,
माझ्याजवळ पल्याडची दृष्टी.
मी वेगळ्याच धुंदीत
शब्दांच्या मस्तीत
मी अवलिया
मस्तमौला फकीर.
घर एक लकीर.
कुशीवरून वळता वळता
म्हणतोस तू सहजच—
“बंद कर लाईट,
डोळ्यावर येतोय
झोपना
कोण वाचणारेय त्या थर्डक्लास कविता.
ही घृणा
उतरते आत.
चिरवेदना होऊन
साध उलट उत्तर न देणारी मी
बनते कवितेत रणरागिणी
अन चकितही होते,
हे माझ कोणत रूप.
कल्पनेतच जगून घेते
एक आयुष्य.
जागतेपणी त्याचे डंख
मिरवताही येत नाहीत
झाकताही येत नाहीत
हे ...हे ...असच अन अजून काहीतरी
सुचल होत आधीही; पण लिहिल नाही.
कुठे मिळतो बाईला
लिहिण्यासाठी असा खास वेळ
लेकराच्या रडण्यात वाहून गेली प्रतिभा
धुन्यासोबत धुवून टाकली स्फूर्ती,
केरवाऱ्यात टाकली कल्पना.
लादलेल्या गृहिणीपणात
पीठावर मारल्या रेघोट्या,
पोळ्या लाटता लाटता
निसटून गेल्यात कितीतरी ओळी,
करपले शब्द.
भाजीच्या फोडणीत टाकल्या मी कविता
अन कळली नाही तुला चव
चरकलेल्या तिखटाची.
लिहिता येईल नंतर
म्हणत उरकत गेले हातातल काम.
मग फुरसतीन ओढला कागद
तर मेले शब्द झाले वैरी.
दिवस कामात बुडालेला अखंड
अन रात्री लिहिण्यावर तुझी बंदी.
सत्तेची केंद्र मंत्रालयातच नसतात
घरातही असतातच की विखुरलेली.
बाईने व्यक्त व्हायचं ?
कस....कुठे ....?
उपेक्षेनेच मारलय मला
अन सतावलय प्रकाशकांनी
कागदाचा खर्च निघत नाही साधा.
खळबट करून वाढवलीत लेकर,
कविता कशी जगवायची ?
तरी रक्तातून वाहते
कविता शाईसारखी !
शाईतून रक्त पाण्यासारख !
काय जपू...?
कसं जपू ...?
स्त्रीत्व येतं आड.
पडतातच चारित्र्यावर धब्बे
      ही कोण...हिच्या कवितेतला
प्रियकर की सहचर ?
कल्पनेतला वाटत नाही
अन तुलाही माहीत पक्कं
तू ही नाहीसच खास.
माझ वस्त्रहरण...
लेखणीतूनही माझ्या बाईपणावरच चर्चा
जगण्याच्या टोकाला तू
मरण्याच्या टोकाला मी.
घरातच चाललय युद्ध
माझ्या लिहिण्यावरून.
केले जाताहेत हात कलम
ठरवून दिलेल्या विषयावरच,
लिहायचं म्हणत....
शब्द माझे शस्त्र,
पण आता मीच म्यान केलेले
कविता कुरुक्षेत्र
माझा होतो अर्जुन
हताश विवश
धनुष्य खाली ठेवणारा
पण
नकोय मला कुणी कृष्ण
गीता सांगणारा.
येत नाही
तत्वज्ञान जगता
तडजोडच करावी लागते शेवटी बाईला.
घर साम्भाळून घेत नाही मला.
अन इकडे
हव ते हव तस उतरत नाही कागदावर.
वाढते बेचैनी,
घेरून टाकत अस्वस्थपण,
कोरत जात भणंगपण,
कुरतडत राहत मीपण
भांडते मी कवितेशी---
“बये, समजून घे गं मला तू जराशी ”,
पण नाही
इथेही हारते मी
अन खरच सांगते
खूप जड जातंय ही हार पचवण,
स्वतःला सोलवटून घेत
हे कविता-बिविता करण
आई म्हणते,
“नुसता येडेपणा आहे ”
असं कवितेने कुठं बदलता येतं का जग ?
२)      आणि ही दुसरी कविता :
बिनदिक्कत  ( कवयत्री : दमयंती मोहन भोईर )

तू म्हणालास, “कर इथे सही !”
तर मी केली
न वाचता, न विचारता .
नवल वगैरे कसलं त्यात,
तू ऊठ म्हटल्यावर उठतेच ना,
आणि बस म्ह्टलस की बसते
आणि हो,
हा मी दाखवलेला विश्वास तुझ्यावर
या भ्रमात राहशील !
तर तसं नक्कीच नाही.
तू करवून घेतलेल्या कवायतीमधून
कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याईतक्या
कमावलेल्या सामर्थ्यावर
मी बिनदिक्कत ठोकलीय सही !
----------------------------


































पहिला कवितेत बाईपणाची खंत आहे, कवितेत योग्य भाव न येण्याची खंत आहे, नवऱ्याच्या वरचढपणाची खंत आहे, कवितेच्या अंमल नसण्याची खंत आहे. एकूणातच ही एक खंत-कविता आहे. अर्थात कवयत्रीला आपली खंत व्यक्त करण्याचा अधिकार आहेच व ही खंत तिने छांन व्यक्त केलेली आहे.
त्याच बरोबर दुसऱ्या कवितेत खंतीपेक्षा स्वतःवरचा विश्वास जास्त आहे. तुला तोंड देण्याचे माझे सामर्थ्य आहे व त्या जोरावर मी बिनदिक्कत सही करते आहे असे इथे कवयतरी म्हणत आहे. गंमत म्हणजे दोन्ही कवयत्री आहेत व त्यांच्या भांवना किती वेगवेगळ्या आहेत. एक भावना टिपिकल बायकी आहे तर दुसरी स्वत्वाची जाणीव असलेली आहे !

------------------------------------------------