बुधवार, १८ डिसेंबर, २०१३

---------------------
प्रथमपुरुषी एकवचनी
( भालचंद्र नेमाडे यांच्यासाठी )..............कवी : दासू वैद्य ( कविता-रती, दिवाळी २०१३ मधून )
-----------------------------------------------------------------
प्रथमपुरुषी
एकवचनी,
वणवण भटकला,
प्रत्येकाने हटकला,
जमेल तिथे स्पष्टीकरण
शक्य तिथे तुष्टीकरण.
राहिला चालत,
आवरेना सुसाट सुटलेलं कथानक
मानवेना रचनेची परंपरा
उपकथानकातल्या अनपेक्षित घटना
घुटमळू लागल्या पायांत,
अगम्य हेलकाव्यांनी
हिंदकळू लागलं अस्तित्वाचं पाणी,
आधार म्हणून कधी ओढ म्हणून
बिलगत गेला एकेका नात्याला.
अडकला पात्रांच्या दाट जाळीत
पसरला जलरंगासारखा भाषेमधून,
कथानकाची गाडी
शेवटच्या स्टेशनात येऊन थांबल्यावर
चाचपले त्याने स्वत:चे खिसे,
खिशात सापडलेल्या
तिकिटावरच्या गावाची अक्षरं
स्टेशनवरच्या नावाशी
किंचितही नव्हती जुळणारी.
तरीही उत्सवी लोक होतेच बाहेर
स्वागताला उत्सुक,
उद्‌घोषणांच्या गोंगाटात
लोक वाजत-गाजत घेऊन गेले
यशस्वी कथानकाला,
प्रथमपुरुषी एकवचनी
शोधू लागला स्टेशनबाहेर
टॅक्सी, रिक्षा, टांगा
इप्सित स्थळी पोचण्यासाठी.

----------------------------------------------
कवितेच्या शीर्षकाखाली कंसात "भालचंद्र नेमाडे यांच्यासाठी" असे लिहून कविता करण्याची ही जुनी परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी श्री. दासू वैद्य ह्यांचे अभिनंदनच करायला पाहिजे. एकेकाळी कवियत्री इंदिरा संत ह्यांनी "केशराचा मळा" ह्या शीर्षकाची कविता श्री. ना.सी. फडके ह्यांच्यावर केलेली मला चांगलीच आठवते. ही जुनी पद्धत असली तरी एका कवीवर, साहित्यकावर कवितेतून केलेली ही अप्रतीम अशी समीक्षा म्हणता येईल.
नेमाडेंना ज्या गावी जायचे होते तिथे ते पोचले नाहीत आणि तरीही लोक त्यांचे स्वागत, उद्‌घोष करीत आहेत असे निष्कर्षाचे वाक्य ह्या कवितेत मोठे कळीचे आहे. नेमाडेंचे सुरुवातीचे लेखन पाहता त्यांना समीक्षेच्या गावी जायचे होते असे कोणालाही वाटते. पण त्यांनी नंतर केवळ कादंबरीची कास धरली व ते भलत्याच गावी पोचले असे कवीला वाटत असावे. किंवा पुरस्कारांच्या भाषेत बोलायचे तर नेमाडेंनी बहुदा "तिकीट" काढलेले गाव "ज्ञानपीठ"चे असावे व ते पोचले फक्त "साहित्य-अकादमी"ला, असाही सूर वरील कवितेतून जाणवू शकतो. अर्थात इथे "ज्ञानपीठ" ऐवजी नेमाडे "नोबेल"चेही तिकिट काढते तरी पोचलेल्या गावी त्यांचा सत्कारच होता. इथे दासू वैद्य समीक्षेच्या पद्धतीने हे दाखवू इच्छित आहेत की त्यांनी जी "प्रथमपुरुषी-एकवचनी" अशी कादंबरीतून शैली अवलंबिली, ( आत्मकथा व काल्पनिक कादंबरी ह्यांचे मिश्रण केले ), त्याने त्यांच्या उपकथानकातल्या पात्रांशी बरेच घोटाळे झाले, त्यांच्या अस्तित्वाचं पाणी ( पोटातलं ) हिंदकळू लागलं. तसेच दासू वैद्य नेमाडेंना त्यांच्या कादंबरीतल्या भाषासौष्ठवासाठीही दाद देत आहेत ते "पसरला जलरंगासारखा भाषेतून"  असे म्हणत. हे अप्रतीम भाष्य समीक्षेच्या प्रांतात गद्यात अशक्यच झाले असते इतके ते इथे काव्यमयरीतीने अवतरले आहे.
नेमाडे "हिंदू" ही कादंबरी, तीन भागात ( अशी त्यांची जाहीरात होती ) आणि गेली ३०/३५ वर्षे लिहीत होते ह्या सृजन-उन्हाळीवर दासू वैद्य अशी टिप्पणी करीत आहेत की "आवरेना सुसाट सुटलेलं कथानक, व मानवेना रचनेची परंपरा !". ही मोठी मार्मिक टिप्पणी असून ते नेमाडेंच्या आवाक्यावर भाष्य करणारे आहे.
जसे परंपरेने आपण घेतलेला वसा टाकत नाही तसेच कदाचित नेमाडे जी शैली ( प्रथमपुरुषी-एकवचनी ) आजही टाकत नाहीत त्यावर दासू वैद्य म्हणत आहेत की शेवटच्या स्टेशनावर पोचल्यावरही ह्या लेखकाला अजूनही टॅक्सी, रिक्षा, टांगा यासारखे एखादे वाहन इप्सित स्थळी पोचण्यासाठी शोधावे लागत आहे. हे एकप्रकारे प्रत्येक लेखकाचेच भागधेय असल्यासारखेही आहे.
कवितेतून समीक्षा करण्याचा हा अनोखा प्रकार आहे आणि त्यात श्री.दासू वैद्य यशस्वी झाले आहेत असेच म्हणावे लागेल.
-----------------------------------


मंगळवार, १७ डिसेंबर, २०१३

...सगळं अंग ठसठसून येत असतं,
तरी, छायडाबाई सुरेभान लांडगे,
तांबडं फुटायच्या आत उठते.

परसाकड जाऊनयेऊन, आंघोळपांघोळ उरकून,
धबाधब साताठ भाक-या थापटून,
डेचकीत कायतरी कालवण उकळून,
सुरेभानला 'च्या' देते, पोरीला खायला घालते.

फडक्यात दुट्टं बांधून पाटीत टाकते,
च्येपल्या पायात सरकवून, पोरीला कमरेवर घेऊन,
झपाझप वावराकडं निघते.

दिवसभर वावरातल्या उस्तवारी करून,
तिसराकपारा जळण सावडीत,
बांधाबांधाने, काट्याकुट्यातून हिंडते,
मोळी बांधते, जळण चुंबळीवर, कमरेवर पाटी,
एका हातानं जमेल तसं पोरीचा हात धरून,
त्राण त्राण गोळा करत, घराकडं.
दिवाबत्ती, सैपाकपानी, पोरीला खाऊ घालते.

सकाळी तालुक्याला कशाला कायनु गेलेला
सुरेभान सयाजी लांडगे, झाकड पडताना माघारा येतो,
झिंगलेला, कोलमडत,
उंब-याला अडखळून धबाकदिशी नाकावर आदळतो,
छायडाबाई भेदरून उठते, सुरेभानला उठवते,
हाताला धरून, कुडाला टेकून बसवते.
पाण्याचा गलास भरून आणते,
गलास हातात घेता घेता, सुरेभान,
कशासाठी कुणास ठाऊक,
एक जोरकस बुक्की
तिच्या गालाच्या आसपास ठेऊन देतो,
“आयघाल्ये..तुह्या मायचा...”
कशासाठी कुणास ठाऊक,
घंटाकभर शिव्यांची फैर चालू ठेवतो,
दमून जातो, छायडाबाई कळ सोसते,
परातीत भाकरीच्या कोरा, ठेचा, कालवण वाढते,
सुरेभानच्या पुढ्यात ठेवते,
सुरेभान अचकटविचकट बोलतो, आणि,
अद्वातद्वा खातो, खातो त्यापेक्षा जास्ती सांडतो,
छायडाबाई परात उचलते, खरकटं वारते,
सतरंजी टाकून देते सुरेभानला,
मध्ये पोरीला टाकून, पोत्यावर आपण पडते.

कधीतरी सुरेभान उठतो, जवळ येतो,
खस्स्कन छायडाबाईला जवळ ओढतो,
छाती कुस्करतो, मिनिटभर,
जमेल तेवढा आत शिरतो. कलंडतो.

छायडाबाई, उन्मळून येणारे कढ आतल्याआत दाबते,
सगळी ठसठस दाबून घेते आतल्याआत.
आढ्याकडं रखरखा बघत जन्माचा धांडोळा घेते,
जमेल तेवढा.  थकून तिचा डोळा लागतो.
...सगळं अंग ठसठसून येत असतं,
तरी, छायडाबाई सुरेभान लांडगे,
तांबडं फुटायच्या आत उठते...
------------------------------------------------------
- बालाजी सुतार, अंबाजोगाई.

-----------------------------------------
---------------------------------------------
वरील कवितेची एक भाषाशास्त्रीय दखल !
----------------------------------------
१) छायडाबाई---"स्त्री ही पुरुषाची छाया असते", असे कोणी छायडाबाईला समजेल तर ह्या नावातल्या "छा" मुळे नावाला तिरस्कार, तुच्छता येते असेही कोणाला वाटेल. ( वाटल्यास हेच नाव छा ऐवजी इतर अक्षरे बदलून ठेवा. जसे: कायडाबाई, खायडाबाई, गायडाबाई...केवळ छायडाबाईलाच तुच्छता येईल !)
२) पुनरावृत्त शब्द वापरल्याने भाषा ठसकेदार होते हे खालील शब्दांनी सिद्धच होते : ठसठसून ; जाऊनयेऊन ; आंघोळपांघोळ ; काट्याकुट्यातून ; बांधा बांधाने ; दिवाबत्ती ; सैपाकपानी ; त्राण त्राण ; कशाला कायनु ; अचकट विचकट ; अद्वातद्वा ; आतल्या आत;
३) ध्वन्यानुकारी शब्दांमुळे शब्दचित्रे उमटतात : जसे : धबाधबा ( ह्यात भाकरी करतानाचा आवाजच ऐकू यावा ) ; धबाकदिशी ; 
रखारखा बघत;
४) काही ग्रामीण शब्दांमुळे नवीन शब्द ऐकल्यासारखे वाटते : जसे : चपला ऐवजी च्येपल्या ; दुटटं बांधून ; चहा ऐवजी च्या ; तिसराकपारा ( ह्या बहुदा काडया असाव्यात ) ; झाकड पडताना ( हे झापड सारखे वाटते किंवा सायंकाळचा शब्द असावा ) ; खरकटं वारते ( वारणे म्हणजे सारणे ) ; जन्माचा धांडोळा ( लुकिंग बॅक ऑन लाइफ ) ;
५) काही शब्द त्यांच्या अर्थापेक्षा बरेच सांगून जाणारे आहेत : जसे : जमेल तेवढे आत शिरतो ; जळण चुंबळीवर ( बाई मोळी डोक्यावर घेऊन चालली आहे, चुंबळीवर असे चित्र कोणालाही दिसावे ! ); लांडगे हे आडनाव मोठे समर्पक वाटते !
६) परिणामकारकता : साधण्यासाठी सुरुवातीच्या ओळी परत शेवटी देण्याने हे रहाटगाडगे कसे फिरते आहे ते चक्क जाणवते !
------------------