बुधवार, १३ मार्च, २०१३

कविता म्हणजे दगडावरची रेघ ?

तरी  
( कवि : दयासागर बन्ने, कविता-रती ( जुलै-ऑगस्ट २००८ ) मधून )

        घुशी वाढलेल्या फार
        किती लिंपाव्यात भिंती ;
        काट्याकुट्याच्या संगाने
        फुले, पाकळ्या फाटती ॥१॥

        वेल मांडवाशी जाता
        येते खुरप्यांना धार ;
        येते खुराड्याबाहेर
        असे टपुनिया घार ॥२॥

        कसे धावायाचे पायी
        कुणी पसरल्या काचा ;
        मुख दिसते मोहक
        पण बसलेली वाचा ॥३॥

        किती पेरणी करावी
        येते आपत्ती मागून ;
        आणि अश्रूंच्या पुरात
        जाते वावर वाहून ॥४॥

        असं विपरीत जिणं
        तरी जगावं लागतं ;
        मुळे जोवरी मातीत
        झाड सोसतं, फुलतं ! ॥५॥

    तसं तर सगळ्या वाङ्मयालाच आपण अक्षर वाङ्मय म्हणतो. पण त्यातल्या त्यात कविता हा प्रकार खरेच अक्षर असाच राहतो. न क्षरणारा, न बदलणारा ह्या अर्थी. निसर्गनियम सारखा बदल करण्याचा, होण्याचा असतो. पण परंपरेने आपण कविता ह्या न बदलणार्‍या ठेवतो. कवीच्या हयातीतच कित्येक शब्दांचे अर्थ बदलतात, त्यातल्या अर्थछटा बदलतात, पण अलिखित नियम असा आहे की एकदा जी कविता केली , बरी वाईट, ती तशीच ठेवायची. त्यात कानामात्राचा फरकही करायचा नाही. जणु कविता म्हणजे दगडावरची रेघच ! खरे तर कवीच्या आयुष्यात व्यक्तिमत्वही व जाणही कालामानाप्रमाणे बदलत जाते. कधी प्रगल्भ होत जाते तर कधी त्यात वेगळ्या जाणीवांचे, विचारांचे धुमारे फुटतात. पण त्या दैवी क्षणाला जी कविता जशी झाली ती कोणी बदलत नाही, पुन: सुधारत नाही. गद्यात असे होत नाही. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या काळात चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला होता. ते आज हयात असते तर त्यात त्यांनी काही बदल केलाही असता. पण विचारांचे काळाप्रमाणे बदलणारे स्वरूप कवीला त्याच्या हयातीत हेरता येत नाही. कलत्या काळी कळले तरी कविता सुधारता येत नाही. पण अर्थाच्या दृष्टीने पाहिले तर हे न बदलणे, न सुधारणे, कवितेची परिणामकारकता निश्चितच कमी करते. वरच्या कवितेच्या उदाहरणाने हे बघू.
    शेतकर्‍याला काय काय हाल अपेष्टा भोगाव्या लागतात, त्यांच्या मार्गात जणु कोणी काचाच पसरवून ठेवतात, त्याची वाचा बसते, निसर्गही निष्ठूर होऊन पेरण्या वाहून नेतो, असं जिणं विपरीत असलं तरी जगावं लागतं. जसं जोवर झाडाची मुळं जमीनीत असतात तोवर त्याला सोसत पण मातीत रुतून राहावचं लागतं, :फुलतही राहावं लागतं असा सोपा अर्थ ह्या कवितेचा आहे. कवितेवर संपादकीय संस्कार करून शब्द बदलण्याची रीत नाहीय. ( गद्यात मात्र कोणताही विषय असला तरी संपादकाची कात्री व डागडुजी अवश्य चालतेच ! ) . पण शेवटच्या ओळीत झाडाने सोसत राहणं आणि "झाड फुलतं !" असं म्हणणं विसंवादी वाटतं. अर्थाचा अनर्थ जरुर होत नाही, पण मातीत आहे म्हणून झाडानं सोसत राहणं, हे "फुलतं" म्हणण्यानं विरुद्ध अर्थाचं होतं . कदाचित्‌ "झुरतं", किंवा "उरतं" असं एखाद्या संवेदनशील रसिकानं म्हटलं असतं. उद्या जर आपल्याच कविता परत सुधारून लिहिण्याची टूम निघाली तर हाच कवि कदाचित "फुलतं" हा शब्द बदलेलही.  पण तोवर अर्थाची गल्लत चालूच राहणार ! झाड सोसतही आहे व फुलतंही आहे, ( मग काय प्रॉब्लेम आहे ?). बरच आहे की असा निष्कारण निघणारा संभ्रम आहे. कवितेचा रोख जो विपरीतपणावर आहे, तो झाड फुलतं म्हणण्यानं पातळ होतो. कविता म्हणजे काय दगडावरची रेघ ? ती सुधारायची नाही ह्या अलिखित परंपरेमुळे "अनर्थ" मात्र उगाचच फुलत राहतात !    ( कविता : अर्थ व अनर्थ ह्या लेखामधून )

--------------------------------------------

सोमवार, ११ मार्च, २०१३

प्रगल्भतेची गिरकी !

----------------------------------------------------------------------
 प्रगल्भतेची गिरकी
-------------------
१९५० मध्ये धारानृत्य व २००८ मध्ये गिरकी ह्या कवितासंग्रहात कवि पाडगावकरांच्या ३६ काव्यसंग्रहातून निदान ३६०० तरी कविता करून झाल्या असतील. एवढ्या विपुल कवितेत एकाच विषयावरच्या  दोन कविता सापडणे सहज शक्य आहे. गिरकी ह्या शीर्षकाच्या ह्या त्या दोन कविता पहा :
गिरकी ( २३-३-१९५६, छोरी मधून):
समोरच्या हिरव्या झाडावर
मऊ पिसांचे इवलेपण गोजिरवाणे
गाते आहे गाणे:
"इथून
हिरव्या इथून
तिकडे
निळ्या पांढर्‍या तिकडे
गेलेच पाहिजे मला"
गेलेच पाहिजे मला
गेलेच पाहिजे मला
ऐकत असता
खिडकीची हट्टी चौकट
मी इथेच बसुनी उंच उडविली पतंगापरी...
या अडेल भिंतीची--मठ्ठ पहार्‍याच्या
क्षणात केली हवा:
विवस्त्र होउन
पिवळ्या पिवळ्या उन्हात न्हाणारी....
डोक्यावरचे छप्पर डफ्फर नुसते
मी पिसांसारखे दूर उडविले
घालुनि बेछूट फुंकर...
ललललला..ललललला...
गेलेच पाहिजे मला...
सोनेरी केसांच्या
खट्याळ मिस्किल डोळ्यांच्या
हातात गुंफुनि हात उन्हाच्या
घेत घेत गिरक्या
न थांबणार्‍या न संपणार्‍या
गेलेच पाहिजे मला
तिकडे
निळ्या पांढर्‍या तिकडे
त्या उंच कड्यावर
त्या उंच कड्याच्या पल्याड...गहिर्‍या पल्याड
गेलेच पाहिजे मला....
केव्हापासून आहे सर्व तयारी
एवढेच माझे ऐक जरा ग :
हे गाठोडे
माझ्या सगळ्या दु:खांचे, चिंतांचे
पोखरणार्‍या.....
आणिक ही माझी काठी
जी मला हवी आधारासाठी
( भार जगाचा उचलुनिया घेतांना
नाही तर बुडेल ना जग ! )
हे सारे
ठेवशील ना जपुनि ?
शपथ गळ्याची
आल्यावर घेइन सगळे ओझे
पुन्हा एकदा खांद्यावरती
पण आता गेलेच पाहिजे मला...
गिरक्या...
न थांबणार्‍या...
न संपणार्‍या गिरक्या
तल्लख हिरव्या गिरक्या
सोनेरी पिवळ्या गिरक्या...
गिरक्यांचे झुबके
एकीतून दुसरी....
दुसरीतुन तिसरी
गिरक्यांचे उनाड ब्रह्म....
----------------------------
गिरकी ( २००८, गिरकी मधून ) :
गिर गिर गिरकी, गिर गिर गिरकी
मीच घेतली माझ्याभवती गिर गिर गिरकी...
स्तब्ध जसेच्या तसे तरीही
भवतीचे जग फिरू लागले गिरकीसंगे;
जरा थांबलो, मेंदू मध्ये तरी राहिली
सुरूच गिरकी; गिर गिर गिरकी
पुन्हा सुरू मी केली गिरकी,
मिटले डोळे तरीही गिरकी,
उघडे डोळे तरीही गिरकी,
गिर गिर गिरकी, गिर गिर गिरकी
गती अशी ही अद‌भुत गिरकी,
गतीस बनवी नर्तन गिरकी,
गिरकीला ह्या कालही नाही, उद्याही नाही,
आजच केवळ अद्‌भुत गिरकी....
पुढे न जाई अशी गती ही,
पडे न मागे अशी गती ही,
जाणे येणे जिचे थांबले अशी गती ही !
जन्म फिरे का मरणाभवती ?
मरण फिरे का जन्माभवती ?
की फिरवी या दोघांनाही
अपुल्याभवती गिर गिर गिरकी ?
अतीत गिरकी, अतीत गिरकी,
केवळ गिरकी...गिर गिर गिरकी....
-----------------

    दोन्ही कवितेत चक्कर, वर्तुळाकार गतीचे, गिरकीचे चित्रण आहे. ५० वर्षांपूर्वीच्या गिरकीत झपाटलेपणाचे, गेलेच पाहिजे मला ह्या अनाम "साद"चे महत्व आहे. आत्ताच्या २००८ च्या गिरकीत गेयता ज्यास्त आहे. गिरकीचे अद‌भुतपण आहे. जन्माचे मरणाभवती फिरणे, पुन:र्जन्म , व मरणाचे जन्माभोवती फिरणे, प्राक्तन वगैरे प्रगल्भ अशा जीवनतत्वांचे गिरकीत दर्शन आहे. तसेच भूत भविष्यातली नाही तर केवळ वर्तमानातली ही अगतिक गिरकी आहे. असे कालसापेक्ष प्रतिपादन आहे. ८४ लक्ष योनींचा फेरा ( जाणे-येणे) चुकवणार्‍या मोक्षाची ही गती आहे असे अध्यात्मिक वर्णन आहे. कवीच्या परिपक्वतेचे एकाच विषयावरचे दोन भिन्न अर्थ असणार्‍या ह्या कविता ( ५० वर्षांनंतरच्या फरकाने ) आपल्याला पहायला मिळतात. इथे जाणवते की प्रतिभा कालांतराने कवीमनाचा विकास साधत साधत प्रगल्भ होते . पहिल्या गिरकी नंतर पाडगावकरांना कोणी "सुधारणा" सुचवल्या असत्या तर त्याची काही खैर नव्हती ! कवीचे प्रगल्भ होणे असे वयोमानाप्रमाणे एकाच शीर्षकाच्या दोन कवितांनी इथे दिसून येते.

------------------------------------------