मंगळवार, १० जानेवारी, २०१७

गोठवावे पाणी ( कवी : मधु जामकर )

गोठवावे पाणी

( कवी : मधु जामकर, कविता-रती दिवाळी २०१६ )
--------------------------------------

दारी पानझड

उडतो पसारा

मिटले आकाश

तेवढा सहारा

वळणावरचे

गळे आवसान

मागे पुढे श्वास

सुटते अवधान

मोजतो आकडे

उलटे सुलटे

घोकतो जगणे

बोचताना काटे

डोळ्याची अंधारी

पुढचे दिसेना

आणखी उसासे

पाऊल सजेना

आता आहे घाई

दिवस यामिनी

ढवळून सारे

गोठवावे पाणी.
-----------

कवितेच्या पहिल्या ओळीतच “दारी पानझड”, म्हणून कवीने कविताभर येणाऱ्या, खिन्न करणाऱ्या, म्हतारपणीच्या, “एकेक पान गळाया...” ह्या मूडची चुणूक दाखविली आहे. आता कवीने कोणता मूड बाळगावा हा त्याचा प्रश्न असला तरी त्याने आपल्या कण्हण्याने माहोल कलुषित करावा ही काही चांगली नीती म्हणता यायची नाही. आता “पानझड” म्हणजे मरणच, असे निसर्गाचा दाखला देत म्हणावे हे विज्ञानाचे जितके अज्ञान, तितकेच ते अतिरंजित होते. पानझडीत पाने गळतात ती येणाऱ्या काळात पाण्याचे दुर्भिक्ष होणार आहे, तेव्हा अती पाणी शोषणारे अवयव, पाने, स्वखुशीने त्यागणे ह्या निसर्गाच्या धोरणाने असते. तो काही मरणाचा धाक नसतो. आता कवींना हे प्राथमिक विज्ञान भले माहीत नसले तरी नशीबाने तो पहिल्या कडव्यात आशावादी आहे तो आकाशामुळे. पाने गळतात, त्यांचा पसारा साचतो, पण तो आटोक्यात ठेवण्यासाठी मिटलेले आकाश आहे व त्याचा कवीला सहारा वाटतो. ह्या एव्हढ्याशा आशेवरून कविता पुढे धकते आहे.

खरे तर एकदा म्हातारपण आले की कसली येताहेत वळणे ? पण समजा एखाद्या कवीच्या जीवनात आली असतील वळणे, तर त्याला सामोरे न जाता, मागे पुढे श्वास होत, कवीचे अवधान गळते आहे. अवसान गळते आहे. परिस्थितीचे काटे बोचताना, तो जगणे घोकतो आहे. इथे ह्याच्या घोकण्याने त्याची जगण्याची लालसा आहे हे किंचित दिसते आहे. पण त्याला पुढचे दिसत नाहीये, अंधारी आली आहे ही द्विधा अवस्था इथे कवीने छान टिपली आहे.

आता कवीला घाई आहे. दिवस रात्र. ( यामिनी म्हणजे रात्र ). कसली ? तर आता पावेतो जे ढवळून काढले आहे ते पाणी गोठवण्याची.

इथे कवी निरवानिरव करतो आहे. पण कशी, तर गोठवण्याने. काय गोठवणे ? तर धडपडीचे, उसन्या बळाचे, पाऊल सजवण्याचे. ढवळण्याचे. म्हातारपणी सगळ्या उर्मी कशा नष्ट करू नयेत, तर गोठवून त्या सुप्त कराव्यात असा कवीचा होरा आहे. ह्या स्थितप्रज्ञ होण्याच्या युगतीने इथे कविता निराशात्मक न होता, उर्मी लपवण्याची ( गोठवून ) युगत सांगणारी होते.      

अति सोप्या सरळ शब्दात मांडणे असले, तरी काही ठिकाणी कवीने अप्रतीम अशी काव्यमय शब्दयोजना केली आहे, जीमुळे कविता खूपच उंची गाठते. पाउल धजणे, ऐवजी कवी इथे “पाऊल सजणे” वापरतो तेव्हा नाहीतरी आपण धीर धरताना आपल्या जीवाला आपण सजवतच असतो, नाही का ? असेच यामिनी . दिवस ह्या वसकन अंगावर येणाऱ्या शब्दाच्या बरोबर खरे तर आपण रात्र ( दिवस-रात्र ) हा शब्द बहुतेक करून वापरतो. पण इथे रात्र हा शब्द कवीला काव्यमय वाटला नसावा. याम म्हणजे प्रहर ( यामिक म्हणजे यांत्रिक/मेकॅनिक पणे , दिवसबरोबर रात्र न वापरता ) कवीने “यामिनी”योजावा हे कवीचे अप्रतीम शब्द्लाघव व काव्यमयता दर्शवते !

--------------------   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा