रविवार, १ सप्टेंबर, २०१३



Ganesh Dighe
---------------------------
धाकाने लपले पान
ओठंगले वाकले भाराने
मनोरम रेंगाळून थेंब हसतो
पान पुन्हा पुन्हा लाजते या ओथंबल्या प्रेमाने
-
भिंगुळला तो थेंब दवाचा
आदिसमेच्या समाधिस्त सन्यस्तेने
की ? तिष्टत पाहत वाट कृपण तो खचला
कळाधीन मातीतील मोहमयी मरणाने
-
माती शुष्क मूक मग्न रुदनात
ओटीतील संप्रधार मुग्ध बाळांच्या आक्रोशाने
शुक्रसुर्य खुणवी तेजस आरस्पानी
भय आक्रंदले खोल काळजात तिच्या …. या विषण्ण थराराने .
----------------------
कवीच्या मनात डोकावता येणे हे अवघडच काम. त्याने कितीही नेकीने कवितेत ते दाखविलेले असले तरी. आता उदाहरणार्थ वरील कविता ( गणेश दिघे ह्यांची ) पाहू. काय म्हणतोय कवि ?
पान कशाने लपले आहे ? तर धाकाने. कोणाचा धाक ? तर पानावर रेंगाळणार्‍या थेंबाचा. ह्या दवबिंदूच्या पानावरच्या प्रेमाने ते पान लाजते आहे. ह्या दवबिंदूला/दवबिंदूतून भिंगासारखे कवीला दिसते आहे. हे भिंगासारखे दिसणे कशाने होते आहे, तर जगाची आदिम अशी जी समाधिस्त सम आहे त्याने. म्हणजे हे कुठल्याशा आदिम प्रेरणेने होते आहे असे कवीला वाटते आहे. त्याच वेळेस कवीला असेही वाटते आहे की रोपे मातीच्या मोहाने मातीत रुजतात, पण कालांतराने मातीच्या कृपणतेने, मरण पावतात, ह्या निरिक्षणाला संन्यस्ततेने हा थेंब पाहतो आहे.
माती अशी मूक रुदनात आहे. तिच्या ओटीत मुग्ध रोपांच्या बाळांचे आक्रोश आहेत. तेजस सूर्य उघडच ही प्रखरता खुणावीत आहे. आणि अशा क्षणी दवबिंदूच्या ह्या निर्मितीच्या कळांविषयी वाटणार्‍या प्रेमाने ती माती थरारते आहे.
कवीचे पर्यावरण, माती, दवबिंदू, सृजन, मरण हे त्याचे स्वत:चे प्रांत आहेत त्यामुळे असेच का म्हणून आपण त्यात खोड काढू शकत नाही. पण कवीला मातीचे सृजन कमी पडते आहे हे जाणवावे व त्यावर दवबिंदू मातीच्या मदतीस येत आहेत असे वाटावे हे अतिशय संवेदनशीलतेचे आहे. दिवसेंदिवस मातीची सृजनशक्ती वाढतेच आहे हे जरी शास्त्रीय अवलोकन असले तरी कवीमनाला तिचे सृजन कमी पडते आहे असे वाटू शकते, कारण तो वाटण्याचा प्रांत आहे. पर्यावरणाने एकमेका साह्य करू असे वाटत दवबिंदूने मातीच्या साह्यास धावून जावे हे कवीचे वाटणे मात्र अतीव कणवेचे आहे व त्यासाठी ह्या कवितेला दाद द्यावी तेव्हढी कमीच आहे.
-------------------------------- 

बुधवार, १३ मार्च, २०१३

कविता म्हणजे दगडावरची रेघ ?

तरी  
( कवि : दयासागर बन्ने, कविता-रती ( जुलै-ऑगस्ट २००८ ) मधून )

        घुशी वाढलेल्या फार
        किती लिंपाव्यात भिंती ;
        काट्याकुट्याच्या संगाने
        फुले, पाकळ्या फाटती ॥१॥

        वेल मांडवाशी जाता
        येते खुरप्यांना धार ;
        येते खुराड्याबाहेर
        असे टपुनिया घार ॥२॥

        कसे धावायाचे पायी
        कुणी पसरल्या काचा ;
        मुख दिसते मोहक
        पण बसलेली वाचा ॥३॥

        किती पेरणी करावी
        येते आपत्ती मागून ;
        आणि अश्रूंच्या पुरात
        जाते वावर वाहून ॥४॥

        असं विपरीत जिणं
        तरी जगावं लागतं ;
        मुळे जोवरी मातीत
        झाड सोसतं, फुलतं ! ॥५॥

    तसं तर सगळ्या वाङ्मयालाच आपण अक्षर वाङ्मय म्हणतो. पण त्यातल्या त्यात कविता हा प्रकार खरेच अक्षर असाच राहतो. न क्षरणारा, न बदलणारा ह्या अर्थी. निसर्गनियम सारखा बदल करण्याचा, होण्याचा असतो. पण परंपरेने आपण कविता ह्या न बदलणार्‍या ठेवतो. कवीच्या हयातीतच कित्येक शब्दांचे अर्थ बदलतात, त्यातल्या अर्थछटा बदलतात, पण अलिखित नियम असा आहे की एकदा जी कविता केली , बरी वाईट, ती तशीच ठेवायची. त्यात कानामात्राचा फरकही करायचा नाही. जणु कविता म्हणजे दगडावरची रेघच ! खरे तर कवीच्या आयुष्यात व्यक्तिमत्वही व जाणही कालामानाप्रमाणे बदलत जाते. कधी प्रगल्भ होत जाते तर कधी त्यात वेगळ्या जाणीवांचे, विचारांचे धुमारे फुटतात. पण त्या दैवी क्षणाला जी कविता जशी झाली ती कोणी बदलत नाही, पुन: सुधारत नाही. गद्यात असे होत नाही. ज्ञानेश्वरांनी त्यांच्या काळात चातुर्वर्ण्याचा पुरस्कार केला होता. ते आज हयात असते तर त्यात त्यांनी काही बदल केलाही असता. पण विचारांचे काळाप्रमाणे बदलणारे स्वरूप कवीला त्याच्या हयातीत हेरता येत नाही. कलत्या काळी कळले तरी कविता सुधारता येत नाही. पण अर्थाच्या दृष्टीने पाहिले तर हे न बदलणे, न सुधारणे, कवितेची परिणामकारकता निश्चितच कमी करते. वरच्या कवितेच्या उदाहरणाने हे बघू.
    शेतकर्‍याला काय काय हाल अपेष्टा भोगाव्या लागतात, त्यांच्या मार्गात जणु कोणी काचाच पसरवून ठेवतात, त्याची वाचा बसते, निसर्गही निष्ठूर होऊन पेरण्या वाहून नेतो, असं जिणं विपरीत असलं तरी जगावं लागतं. जसं जोवर झाडाची मुळं जमीनीत असतात तोवर त्याला सोसत पण मातीत रुतून राहावचं लागतं, :फुलतही राहावं लागतं असा सोपा अर्थ ह्या कवितेचा आहे. कवितेवर संपादकीय संस्कार करून शब्द बदलण्याची रीत नाहीय. ( गद्यात मात्र कोणताही विषय असला तरी संपादकाची कात्री व डागडुजी अवश्य चालतेच ! ) . पण शेवटच्या ओळीत झाडाने सोसत राहणं आणि "झाड फुलतं !" असं म्हणणं विसंवादी वाटतं. अर्थाचा अनर्थ जरुर होत नाही, पण मातीत आहे म्हणून झाडानं सोसत राहणं, हे "फुलतं" म्हणण्यानं विरुद्ध अर्थाचं होतं . कदाचित्‌ "झुरतं", किंवा "उरतं" असं एखाद्या संवेदनशील रसिकानं म्हटलं असतं. उद्या जर आपल्याच कविता परत सुधारून लिहिण्याची टूम निघाली तर हाच कवि कदाचित "फुलतं" हा शब्द बदलेलही.  पण तोवर अर्थाची गल्लत चालूच राहणार ! झाड सोसतही आहे व फुलतंही आहे, ( मग काय प्रॉब्लेम आहे ?). बरच आहे की असा निष्कारण निघणारा संभ्रम आहे. कवितेचा रोख जो विपरीतपणावर आहे, तो झाड फुलतं म्हणण्यानं पातळ होतो. कविता म्हणजे काय दगडावरची रेघ ? ती सुधारायची नाही ह्या अलिखित परंपरेमुळे "अनर्थ" मात्र उगाचच फुलत राहतात !    ( कविता : अर्थ व अनर्थ ह्या लेखामधून )

--------------------------------------------

सोमवार, ११ मार्च, २०१३

प्रगल्भतेची गिरकी !

----------------------------------------------------------------------
 प्रगल्भतेची गिरकी
-------------------
१९५० मध्ये धारानृत्य व २००८ मध्ये गिरकी ह्या कवितासंग्रहात कवि पाडगावकरांच्या ३६ काव्यसंग्रहातून निदान ३६०० तरी कविता करून झाल्या असतील. एवढ्या विपुल कवितेत एकाच विषयावरच्या  दोन कविता सापडणे सहज शक्य आहे. गिरकी ह्या शीर्षकाच्या ह्या त्या दोन कविता पहा :
गिरकी ( २३-३-१९५६, छोरी मधून):
समोरच्या हिरव्या झाडावर
मऊ पिसांचे इवलेपण गोजिरवाणे
गाते आहे गाणे:
"इथून
हिरव्या इथून
तिकडे
निळ्या पांढर्‍या तिकडे
गेलेच पाहिजे मला"
गेलेच पाहिजे मला
गेलेच पाहिजे मला
ऐकत असता
खिडकीची हट्टी चौकट
मी इथेच बसुनी उंच उडविली पतंगापरी...
या अडेल भिंतीची--मठ्ठ पहार्‍याच्या
क्षणात केली हवा:
विवस्त्र होउन
पिवळ्या पिवळ्या उन्हात न्हाणारी....
डोक्यावरचे छप्पर डफ्फर नुसते
मी पिसांसारखे दूर उडविले
घालुनि बेछूट फुंकर...
ललललला..ललललला...
गेलेच पाहिजे मला...
सोनेरी केसांच्या
खट्याळ मिस्किल डोळ्यांच्या
हातात गुंफुनि हात उन्हाच्या
घेत घेत गिरक्या
न थांबणार्‍या न संपणार्‍या
गेलेच पाहिजे मला
तिकडे
निळ्या पांढर्‍या तिकडे
त्या उंच कड्यावर
त्या उंच कड्याच्या पल्याड...गहिर्‍या पल्याड
गेलेच पाहिजे मला....
केव्हापासून आहे सर्व तयारी
एवढेच माझे ऐक जरा ग :
हे गाठोडे
माझ्या सगळ्या दु:खांचे, चिंतांचे
पोखरणार्‍या.....
आणिक ही माझी काठी
जी मला हवी आधारासाठी
( भार जगाचा उचलुनिया घेतांना
नाही तर बुडेल ना जग ! )
हे सारे
ठेवशील ना जपुनि ?
शपथ गळ्याची
आल्यावर घेइन सगळे ओझे
पुन्हा एकदा खांद्यावरती
पण आता गेलेच पाहिजे मला...
गिरक्या...
न थांबणार्‍या...
न संपणार्‍या गिरक्या
तल्लख हिरव्या गिरक्या
सोनेरी पिवळ्या गिरक्या...
गिरक्यांचे झुबके
एकीतून दुसरी....
दुसरीतुन तिसरी
गिरक्यांचे उनाड ब्रह्म....
----------------------------
गिरकी ( २००८, गिरकी मधून ) :
गिर गिर गिरकी, गिर गिर गिरकी
मीच घेतली माझ्याभवती गिर गिर गिरकी...
स्तब्ध जसेच्या तसे तरीही
भवतीचे जग फिरू लागले गिरकीसंगे;
जरा थांबलो, मेंदू मध्ये तरी राहिली
सुरूच गिरकी; गिर गिर गिरकी
पुन्हा सुरू मी केली गिरकी,
मिटले डोळे तरीही गिरकी,
उघडे डोळे तरीही गिरकी,
गिर गिर गिरकी, गिर गिर गिरकी
गती अशी ही अद‌भुत गिरकी,
गतीस बनवी नर्तन गिरकी,
गिरकीला ह्या कालही नाही, उद्याही नाही,
आजच केवळ अद्‌भुत गिरकी....
पुढे न जाई अशी गती ही,
पडे न मागे अशी गती ही,
जाणे येणे जिचे थांबले अशी गती ही !
जन्म फिरे का मरणाभवती ?
मरण फिरे का जन्माभवती ?
की फिरवी या दोघांनाही
अपुल्याभवती गिर गिर गिरकी ?
अतीत गिरकी, अतीत गिरकी,
केवळ गिरकी...गिर गिर गिरकी....
-----------------

    दोन्ही कवितेत चक्कर, वर्तुळाकार गतीचे, गिरकीचे चित्रण आहे. ५० वर्षांपूर्वीच्या गिरकीत झपाटलेपणाचे, गेलेच पाहिजे मला ह्या अनाम "साद"चे महत्व आहे. आत्ताच्या २००८ च्या गिरकीत गेयता ज्यास्त आहे. गिरकीचे अद‌भुतपण आहे. जन्माचे मरणाभवती फिरणे, पुन:र्जन्म , व मरणाचे जन्माभोवती फिरणे, प्राक्तन वगैरे प्रगल्भ अशा जीवनतत्वांचे गिरकीत दर्शन आहे. तसेच भूत भविष्यातली नाही तर केवळ वर्तमानातली ही अगतिक गिरकी आहे. असे कालसापेक्ष प्रतिपादन आहे. ८४ लक्ष योनींचा फेरा ( जाणे-येणे) चुकवणार्‍या मोक्षाची ही गती आहे असे अध्यात्मिक वर्णन आहे. कवीच्या परिपक्वतेचे एकाच विषयावरचे दोन भिन्न अर्थ असणार्‍या ह्या कविता ( ५० वर्षांनंतरच्या फरकाने ) आपल्याला पहायला मिळतात. इथे जाणवते की प्रतिभा कालांतराने कवीमनाचा विकास साधत साधत प्रगल्भ होते . पहिल्या गिरकी नंतर पाडगावकरांना कोणी "सुधारणा" सुचवल्या असत्या तर त्याची काही खैर नव्हती ! कवीचे प्रगल्भ होणे असे वयोमानाप्रमाणे एकाच शीर्षकाच्या दोन कवितांनी इथे दिसून येते.

------------------------------------------
   

सोमवार, ७ जानेवारी, २०१३

समवयस्काच्या दारासमोर ( कवी दासू वैद्य )


समवयस्काच्या दारासमोर
------------------------
कवी : दासू वैद्य ( कवितारती दिवाळी २०१२ मधून )
------------------------------
अर्थाच्या गर्द सावलीत
पहुडलेले शब्द
नसतात उत्सुक
सांत्वनाच्या अंगणात यायला
मग आपण नुसतेच स्तब्ध राहतो
दिवंगताच्या दारासमोर,
थोडी माणूसकी,
थोडा शिष्टाचार,
कधी शेजारधर्म
म्हणून आपण रेंगाळतो
मेलेल्या माणसाच्या अंगणात.
पण कोणी समवयस्क गेल्यावर
जरा ज्यास्तच रेंगाळतो आपण,
रडून थकलेल्या
समवयस्काच्या बायकोचा चेहरा
अचानक आपल्या बायकोसारखा
दिसू लागतो,
शोकाचा केंद्रबिंदू होऊन
झोपलेल्या समवयस्काची मुलं
काहीतरी हरवल्यासारखी
आतबाहेर करतायत
तेव्हा या मुलांच्या चपला-बुटात
आपल्या मुलांचे पाय
सहज बसतील याचा विचित्र अंदाज
डोक्यात चमकतो,
आपल्याही नाका-कानात
कापसाचे बोळे असल्यासारखं
वाटू लागतं,
चितेत निवांत झोपलेला
विधिवत पेटवला जातो,
चारी अंगांनी पेटलेल्या चितेत
भुरुभुरु जळू लागतो समवयस्क.

अंग मात्र आपलं गरम होतं.
------------------------------------------
    पहिलं अभिनंदन ह्याचं की ह्या कवितेला तुम्ही अभंग वा इतर वृत्त न वापरता मुक्तछंदच वापरला आहे. मरणाच्या कल्पनेला मुक्तछंदी पसरच मानवतो. कारण मरण हेच मुळी सगळ्या अनुभवांचे लयाला जाणे असल्याने, लयालाच मुक्त करणे हे अगदी चपखलपणाचे आहे. कवितेचा चेहरामोहराच असा थेट प्रत्ययाशी जुळणारा होतो व धीरगंभीरतेचे सूतोवाच होते.
    आजकालचे चित्रकार जसे भावचित्रातल्या व्यक्तीचा नेमका चेहरा न काढता ( चेहर्‍यात नाक डोळे हे थेट ओळख देववणारे अवयव न रेखाटता ) नुसता (ब्लॅंक) अनोळखी चेहरा ठेवतात त्याचप्रमाणे तुम्ही "समवयस्क" हा बिनओळखीचा चेहरा कवितेत गडद केला आहे. खरे तर हा कोणी तरी तुमचा जवळचा मित्र, शेजारी वगैरे नावानिशी असणारा आहे. पण त्याला तुम्ही एक व्यक्ती न ठेवता त्याचा एक वर्ग केला आहे. त्यामुळे हे कोणा एकाचे मरण राहिले नाही तर एका संपूर्ण वर्गाचे, समवयस्कांचे, मरण झाले आहे. ह्यामुळे वाचकालाही ते आपलेही मरण वाटण्याला सोपे जाते कारण नेमका चेहरा रेखाटलेला नसल्याने आपला चेहराही आपण पटकन्‌ त्या जागी कल्पू शकतो. इथे मला फेसबुकची आठवण येते, जेव्हा काही लोक आपला स्वत:चा फोटो न टाकता जनरल फोटोचे प्रोफाईलच राहू देतात. अशाने कोणालाही आपला चेहरा त्याजागी कल्पिता येतो. ह्या योजकतेमुळे कवितेचा प्रभाव प्रचंड वाढतो.
    सामान्यत: जवळच्या माणसांच्या मरणावर जेव्हा कविता करतात तेव्हा स्मशान-वैराग्याची भावना टाळता येणे मोठे जिकीरीचे काम असते. पण आजकाल स्मशान-वैराग्य तसे लवकर येत नाही. कदाचित आजकाल भावनाच मुळी व्यवहाराच्या धारेमुळे बोथट झालेल्या असाव्यात किंवा मरणाराच्या इतक्या जवळचे कोणी असतच नाही असेही असावे. ह्या बदललेल्या जाणीवेंचा स्वीकार करीत त्याला तुम्ही एक वेगळीच छटा दिली आहे. आपण सगळे मर्त्य आहोत हे आपल्याला माहीत असूनही कोणी स्वत: मरायला राजी नसतो किंवा क्वचितच तशी शक्यता आपल्या मनाला कधी चाटून जाते. पण मेलेल्याच्या बद्दल सहवेदना मात्र आपल्याला हलकेच जाणवते. म्हणजे लगेच भीती किंवा अश्रू आले असे न होता, आता हा आपला समवयस्क आणि तो मेला म्हणजे त्याच्या बायकोसारखी आपली बायकोही विधवा होऊ शकते ही शक्यता आपल्याला चाटून जाते. किंवा मेलेल्याची मुले जे चपला-बुट घालताहेत त्याच मापाची आपलीही मुले आहेत की व त्यांचेही असे होऊ शकते हे पटते. ह्या हळू हळू जाणवत जाणार्‍या भावनेत आपण मरणार आहोत अशा स्पष्ट जाणीवेची सुरुवात नाहीय, तर आपली बायकापोरे असेच पोरके होऊ शकतील अशी त्यांच्याबद्दलचे वाटणे आहे. हे जरा रुक्ष वाटणारे असले तरी परिस्थितीला प्रामाणिक राहणारे, व्यवहारी आहे.
    आणि समवयस्काची चिता चारी बाजूनी पेटली की क्षणात सहवेदनेचे शिखरावर जाणे होते आणि समवयस्क जळू लागतो व आपले अंग गरम होऊ लागते असे त्याचे मार्मिक वर्णन योग्य तो क्लायमॅक्स साधते. हे कवितेचे असाधरण कसब आहे. ( मी ही कविता केली असती तर कदाचित "अंग मात्र आपलं गरम होतं" ऐवजी "अंग मात्र आपलं वितळू लागतं" असं म्हटलं असतं. कदाचित त्यानं क्लायमॅक्स थोडा नाट्यमय, भडक, झाला असता, पण क्लायमॅक्सची उंचीही वाढली असती. कवीला कोणी सुधारणा सुचविण्याची आपल्याकडे पद्धत नाही, पण कवीने वाचकाला कवितेत जर इतके गुंफून ठेवले असेल तर त्याने त्याचे वाटणे सांगायचे तरी कोणाला ? ) . असो. कविता मला खूप आवडली.
------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

शुक्रवार, २३ मार्च, २०१२



कविता म्हणजे----(३)
गाणारा पक्षी  ( कवी: पु.शि.रेगे "दुसरा पक्षी"मधून )

पक्षी गात नाही
आपल्या सीमांची कक्षा घोषित करतो.

सिंह डरकाळ्या फोडीत नाही
आपली हुकुमत कुठं कुठं आहे ते बजावून सांगतो.

हत्ती झाडांना अंग घाशीत नाही
आपल्या प्रदेशाच्या खुणा ठरवून देतो.

मी कविता करीत नाही
माझ्या मनाची आणि तुझ्या धांव घेतो.
--------------------------------------------------------------------------------------------------------------

    ह्या कवितेतल्या प्रतिमांची ( कवीला दिसलेल्या चित्रांची ) जंत्री केली तर तीत अशी चित्रे दिसतात : १) गाणारा पक्षी २) डरकाळ्या फोडणारा सिंह ३) झाडांना अंग घासणारा हत्ती ४) कविता करणारा कवी ( मी ) ५) पक्षी सीमा घोषित करतो आहे ६) सिंह आपली हुकुमत कुठे कुठे आहे ते दाखवतोय ७) हत्ती आपल्या प्रदेशाच्या खुणा ठरवतोय ८) कवी आपल्या मनाची व प्रेयसीची धांव घेतोय. ह्यातील १) ते ४) ही चित्रे अगदी सरळ-साधी चित्रणे आहेत तर ५) ते ८) चित्रे ही पहिल्या गटातील (१ ते ४) चित्रांचा अर्थ लावणारी चित्रे आहेत. सकृदर्शनी कवीने नुसती चित्रे सादर केली आहेत असे दिसते. पण जरा काळजीपूर्वक पाहिले तर प्रत्येक चित्रावर त्याने आपला तर्क चालवलेला आहे व त्याचा अर्थ दिला आहे असे दिसेल. जसे: गाणारा पक्षी नुसते गात नाहीये तर तो आपल्या सीमा घोषित करतो आहे. डरकाळ्या फोडणारा सिंह आपली हुकुमत कुठे कुठे आहे ते दाखवतोय. झाडांना अंग घासणारा हत्ती आपल्या वावर-प्रदेशाच्या खुणा ठरवतोय. कवी कविता करीत नाहीय तर त्याच्या मनाची व प्रेयसीची धांव घेतो आहे.
    कोणाही जाणकार प्राणी-मित्राला विचारले तर सिंहाचे, हत्तीचे ( एव्हढेच काय कुत्र्यांचेही ) हे आपली सत्ता-प्रदेश इतरांना दाखवून देण्याचे प्रघात आहेत, असे कळेल. म्हणजे हे नैसर्गिक आहे हे ठाम झाले. इथे कवी क्रमा क्रमाने आपल्याला ह्या तर्काला बांधून शेवटाला घेऊन जातो व म्हणतो की असेच माझी कविता ही कविता नसून तुझे व माझे प्रदेश दाखवणे आहे. शिवाय हे किती नैसर्गिकही आहे, सुंदर आहे. हे रेगे ह्यांचे प्रामाणिकपणे आपल्याला दिसलेल्या चित्रांचे दाखवणे आहे की नेटाने तर्क लढवून कविता ही त्यांच्या व प्रेयसीचे प्रदेश दाखवणे आहे हे पटवणे आहे ? आता ही काही लबाडी म्हणता येणार नाही. प्रख्यात विदुषी मार्जोरी बोल्टन ह्यांच्या "ऍनॉटॉमी ऑफ पोएट्री" ह्या पुस्तकातल्या "इंटेलेक्च्युयल फॉर्म:द टू मेन पॅटर्न्स ऑफ इमेजरी" ह्या प्रकरणातले हे वाक्य पहा  (पृ.११२ ) : "तर्कसंगती हे जागृत मनाचे लक्षण आहे व भावनेच्या विरोधी आहे. श्रेष्ठ कवितेत भावनेचा भडिमार असून त्याचबरोबर सुसंबंद्ध आंतरिक तर्कही असेल. तर्काची सुसंगती ही चांगल्या कवितेच्या रचनेचा महत्वाचा भाग असतो, व तो प्रतिमांच्या अनाकलनीय परिणामांपेक्षा जोरदार असतो. " ह्या अंगाने, प्रत्येक प्राणीमात्र आपल्या वावर-सत्तेच्या प्रदेशाच्या खुणा दाखवीत असतो, हे ह्या कवितेतल्या तर्कामागचे मूलसूत्र होते.
    प्रत्येक संबंधात (रिलेशन) त्यातल्या घटकांना आपला स्वतंत्र प्रदेश ( स्पेस ) लागतो हे आता जवळ जवळ मान्यच झाले आहे. ह्या स्वतंत्र वावराला वाव मिळाला नाही तर संबंध विकोपाला जातात हे कोणत्याही कौटुंबिक कोर्टात न जाताही आपण मान्य करू इतके ते पटण्याजोगे आहे. असे असताना कवीने असे जर म्हटले असते की माझ्या कवितेत तुझे प्रदेश व माझे प्रदेश असे मी दाखवतोय तर ते ह्या तर्क-संगतीची पुढची कडी झाले असते. रेगे ह्यांच्या वैयक्तिक चरित्रातही ते रास्त ठरते. जसे : बायको सरिताबाईंचा एक प्रदेश, जर्मन प्रेयसी केठ ह्यांचा एक प्रदेश, मुलाबाळांचा एक प्रदेश, मित्रांचा एक वगैरे. पण ते जेव्हा शेवटच्या ओळीत म्हणतात की माझ्या कवितेत मी माझ्या मनाची व तुझ्या ( मनाची ) धांव ( ओढ ) घेतोय तर ते ह्या प्रादेशिक रचना करण्याच्या तर्काविरुद्ध जाते. प्रियकर प्रेयसी ह्यांचे मनोमीलन हे रोमॅंटिक व आदर्श खासच असते पण मग त्यासाठी सिंह, हत्ती हे आपले वेगळे प्रदेश करतात ( इतरांपासून ) ही तर्काची दोरी रास्त ठरत नाही.
    कवी भले म्हणो की मी माझ्या मनाची व तुझ्या मनाची धांव घेतोय पण वाचकरूपी तिसर्‍या अंपायरला विचारलेत तर तो धांव-चित ( रन-आऊट)  झालाय असाच निर्णय द्यावा लागेल. कारण ह्या कवितेत केवळ प्रतिमांचा खेळ असता, नुसती पक्षी, सिंह, हत्ती ह्यांची चित्रे असती,  तर कसल्याही निर्णयाचे कवीचे म्हणणे चालले असते. त्याला समीक्षकांप्रमाणे वाचकही अप्रतीम म्हणते झाले असते. पण ह्या कवितेत तर्क हीच मोठी प्रतिमा आहे व शेवटचे चित्र हे तर्क-विसंगत ठरते !
    कै.पु.शि.रेगे ह्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताच्या अंकात ( कविता-रती मार्च-जून २०११ ) प्रा.गंगाधर पाटील ह्यांचा एक "गाणारं झाड" नावाचा रेगे यांच्या आठवणींवरचा लेख आहे. त्या लेखात त्यांनी रेगे ह्यांना कशा काही कविता "दिसत" असत व ते लगेच त्या टिपून घेण्यासाठी रात्री उशाशी कागद-लेखणी ठेवीत असत असे सांगितले आहे. चक्क दिसलेली कविता व जोडून मोडून केलेली कविता ह्या संबंधी आपल्याला नेहमीच कुतुहूल असते. काही प्रमाण असो वा नसो, एक असे वाटत असते की जी कविता अशी "दिसते" ती दैवीच  म्हणावी लागेल. ( मराठीतल्या विदुषी दुर्गा भागवत ह्या ग्रेस ह्यांच्या कवितांना असेच विशेषण लावीत. ). अशा दैवी कवितात कोलेरिज ह्यांच्या "कुबला-खान" ह्या शंभर ओळींच्या कवितेला सर्वात उच्च स्थान असावे, कारण ती म्हणे त्यांना शीर्षकासह दिसली होती. ह्यावर लगेच इस्लामवादी म्हणतील की मोहमंद पैगंबराला अपरिचित अशा भाषेत ज्या कविता दिसल्या ( म्हणजे आजचे कुराण ) त्यांनाच हे स्थान द्यावे, कारण त्या नुस्त्याच टिकल्या नाहीत तर त्यामागे आज एव्हडी प्रचंड संस्कृती उभारलेली आहे .
    महाराष्ट्र काव्यभूषण श्री.मंगेश पाडगावकर सांगतात की त्यांना अकस्मात कवितेची एक ओळ सुचते व ती बरेच दिवस त्यांचा पिच्छा पुरवते व मग ते त्या ओळीतल्या भावनेनुसार त्याची चारोळी, वात्रटिका, गजल, सुनीत, भावगीत, गीत किंवा कविता अशी कलाकृती करतात. त्यांना प्रसंग, चित्र, देखावा दिसतो असे ते म्हणत नाहीत. कवी ग्रेस ह्यांना मात्र रात्री अपरात्री देखावे, दृश्ये दिसतात व त्यांच्या ते कविता करतात. असेच पु.शि.रेगे ह्यांना प्रसंग, देखावे दिसले व त्यावर त्यांनी कविता रेखल्या असे प्रा.गंगाधर पाटील ह्यांनी मांडले आहे. शास्त्रीय ( मेंदू बाबत ) दृष्टीने माग काढला तर असे आढळते की आपल्या मेंदूत विचार करण्याची काही कळच नाही.आपण एक तर साठवलेल्या आठवणी माघारी काढू शकतो किंवा येत असलेले अनुभव अगोदर असलेल्या अनुभवांशी पडताळून त्यांना योग्य कप्प्यात साठवू शकतो. पण आपल्याला स्वप्ने पडतात, चित्रे दिसतात हे तर नाकारता येतच नाही. स्वप्ने वा चित्रे दिसणे हे आपल्या मेंदूला खूपच सोयीचे आहे. कारण चित्रांऐवजी येणारे विचार जर शब्दात आले असते तर एखादे स्वप्न वाचायला आपल्याला कैक दिवस लागले असते. ( आपला लिहिण्याचा वेग असतो ४०/५० शब्द दर मिनिटाला, तर वाचण्याचा वेग असतो ८०/९० शब्द दर मिनिटाला. मनात वाचण्याचा वेग असतो १५०/१६० शब्द दर मिनिटाला. ) त्या मानाने अनेक शब्द लागणार्‍या वर्णनाचे एक चित्र ( फ्रेम ) धरले तर आपल्या पाहण्याचा वेगच असतो २४ फ्रेम्स दर सेकंदाला. म्हणजे क्षणात आपण कित्येक शब्दांचे चित्र ( फ्रेम ) वाचू शकतो, पण चित्राच्या भाषेत. आता ही चित्रेच म्हणजे प्रतिमा, असे धरले तर, ज्या कवींना कविता दिसतात असे मानले तर कवितेतल्या प्रतिमा ह्याच त्यांना दिसलेल्या प्रतिमा असे होईल. त्या प्रतिमा आपणही त्यांच्या कवितेतून पाहू शकतो.



-----------------------------------------------------

शनिवार, २९ ऑक्टोबर, २०११

------------------------------------------------------------------------------------------------

कविता म्हणजे.....(२)

एकपण ( कवी: ग्रेस , "सांजभयाच्या साजणी"-पॉप्युलर प्रकाशन, पृ.१५ )

माझ्या गात्रांत फुटले
उन्ह-कळ्यांचे तरंग
चार डोळ्यांनी झाकिले
तुझे माझे सारे अंग !
एका शब्दाने नभाला
नको करूस पोकळी
झाड तोडून घावांनी
केली सावली मोकळी....

---------------------------

कवी ग्रेस हे मराठी सारस्वतातले फार दबदबा असलेले कवी आहेत. गूढतेचे वलय ल्यालेले, तितकीच अप्रतीम शब्दकळा वृत्तातून प्रकट करणारे. ह्यांना कविता साक्षात "होतात", असा बोलबाला आहे.
झाड आणि झाडाची सावली ह्यांचे जसे "एकपण" असते व ते झाड तोडल्यावरच, झाड व सावली असे वेगळे होते, तसेच माझी गात्रे व त्यात नित्य उठणारे उन्हाचे, उत्साहाचे तरंग ह्यांचे "एकपण" आहे. तुझे दोन व माझे दोन अशा चार डोळ्यांनी आपण एकमेकांना पाहतो तेव्हा तुझे व माझे सारे अंग झाकून जाते, इतके आपले "एकपण" आहे. झाड जसे घावांनी तोडल्या जाते ( कुर्‍हाडीच्या घावांनी ) तसे आपल्यातले आभाळ ( आसमंत, नभ ) एखाद्या दुखावणार्‍या शब्दाने पोकळ करू नकोस, भेदू नकोस. आपले "एकपण" असेच असू दे. असा सरळ सोपा अर्थ असणारी ही छोटेखानी कविता आहे.
ग्रेस कवितेतली शब्दयोजना फार मोजून मापून करतात. साधारणपणे "तरंग" हे पाण्यावर "उठतात". कदाचित उमटलेले दिसतात. म्हणून वाक्‌प्रचार "तरंग उठतात" असा रूढ झाला असेल. पण गात्रात, इंद्रियात हे तरंग "फुटले" आहेत असे कवी म्हणतो. फुटण्याची क्रिया उस्फुर्त किंवा दैवीच म्हणायची. ह्या उलट "उठणे" हे कशाची तरी प्रतिक्रिया म्हणून होणारी क्रिया आहे. म्हणूनच भाव-भावनांचे स्फुरणे ह्याला कवी "माझ्या गात्रात फुटले, उन्ह-कळ्यांचे तरंग" असे म्हणून ते कुठल्यातरी अज्ञात संकेताने, उस्फूर्तपणे फुटलेले आहेत असे सांगतो. खरे तर हा कवी "संध्याकाळ"चा सदैव आगळेपणा मिरवणारा कवी आहे. पण इथे तो हे "तरंग", उन्ह-कळ्यांचे आहेत असे म्हणतो. "कळ्यांचे" हा शब्द योजून ही नुकतीच उमलणारी उन्हे आहेत असे कवी दाखवीत आहे. संध्याकाळच्या उदासीनतेचे हे कढ नसून नुकत्याच उमलणार्‍या उन्हासारखे, उत्साहाचे, हे तरंग भाव-भावनांचे, माझ्या गात्रात फुटत आहेत असे हे वर्णन होते.
पाहणार्‍याच्या डोळ्यात सौंदर्य असते ( "ब्यूटी इज इन द आय ऑफ बिहोल्डर ") असे म्हणतात. तसेच पाहण्याने म्हणजे डोळ्याने एखाद्या वस्तूचे सौंदर्य "उकलते", उलगडते. पण इथे कवी म्हणतो "झाकिले". तर ह्याचा अर्थ असा काढावा लागतो की मी तुला पाहतो तेव्हा माझे "मी-पण" मी झाकतो, तसेच तू मला पाहतेस तेव्हा तुझे "मी-पण" झाकल्या जाते. तर असे चार डोळ्यांनी आपण एकमेकांना पाहतो तेव्हा आपली अंगे झाकल्या जातात कारण ती इतकी एकमेकात एकपणाने आहेत. ह्याच बाबत आरती प्रभु एके ठिकाणी म्हणतात : "चार डोळे : दोन काचा दोन खाचा ". किंवा कुठल्या कुठल्या भूमिकेचा आपण चष्मा चढवलेला असेल तर मग जसे स्वत:चे अंग झाकल्यासारखे दिसत नाही, ज्या भूमिकेचा चष्मा असेल तसेच दिसते, असाही अर्थ "झाकिले"चा निघू शकतो.
कवीला आर्तपणाचे, उत्कटतेचे खूपच अप्रूप आहे. त्यामुळे हे "एकपण" असेच राहो, न दुभंगो, असे चिंतताना त्याला प्रतिमा सुचते ती झाड घावांनी तोडल्याने त्याची सावली झाडापासून तुटल्याची. झाड आणि सावली ह्यांचे "एकपण" जसे आहे तसे तुझे नि माझे नभ एकपणात आहे असेही कवी सुचवतो. व हे नभ एखाद्या घाव करणार्‍या शब्दाने पोकळ करू नकोस ( नभ तोडता येत नाही, ते पोकळ होऊ शकते ) अशी कवी इच्छा व्यक्त करतो. रासलीलेत जसे कृष्ण आणि गोपी ह्यांचे "एकपण" आपण कल्पितो तसे कवी इथे झाड सावली, गात्रे-भावभावना, तू-मी ह्यांचे "एकपण" चितारत आहे. ते छान जमून आले आहे.


--------------------------------------------------------------------------------------------------------
अरुण अनंत भालेराव

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०११

कविता म्हणजे....(१)
-------------------------------------------------------------------
विपरीत : ( कवी : कविता म्हेत्रे , कविता-रती, मार्च-जून २०११)

नांगरणी करून
एके ओळीत समंजस
दाणे पेरताना
मायेच्या हातानं पाणी
पाजलेले
सुखद भोग
वाटयाला आले असते तर--
गाळून घेतलेल्या माझ्या
रक्तबीजांना
वाढायला हरकत कशाची होती ?

जिथं उगवणार नाही काहीच
अशा वांझ मातीत
पेरायचे अट्टाहास
आणखीन ठिसूळ होत जाताना,
वाया चाललेलं एक एक हंगाम
उरल्या जगण्याचं
अवसानही
काढून घेतात--
डोळे आकाशाला लावून बसलेली
मुळासकट करपलेली
ही बेहिशोबी झाडं.

पायाखालची ओली माती तरी
त्यांनी
शाबूत ठेवायची होती !
----------------------------------------

मार्च-जून २०११ च्या कविता-रतीतली ही एक कविता आहे. म्हणजे आत्ता आत्ताचीच.
नांगरून एका ओळीत पेरलेले दाणे, हे समंजस आहेत, ही एक अप्रतीम कवी कल्पना आहे. त्यांचा समंजसपणा एका ओळीत असण्याने तर आहेच, शिवाय ते योजलेल्या क्रियांवरून ( जसे खत देणे, पाणी देणे, वारा-ऊन वगैरे ) वाढतात ह्यात ज्यास्त आहे. त्यांना पाणी देऊन वाढताना जे सुखद भोग ( जसे नवे अंकुर येणे, कोंभाची चांगली वाढ होणे, झाडाचे तरारणे, फुले फळे येणे ) आहेत तसेच भोग माझ्या वाटेला ( माझ्या रक्तबीजांच्या वाटेला ) आले असते तर ? इथे कवयित्रीची काहीशी खिन्नता दिसते. रक्तबीज म्हणजे डिएनए किंवा व्यक्तिमत्वाची सुप्त बीजे असे धरले तर नक्कीच एक खंत व्यक्त केलेली आहे . जिथे काहीच उगवणार नाही अशा निराशेने वांझ जमीनीचे अवसानही काढून घेतात. झाडंही करपलेली आहेत. त्यांनी निदान पायाखालची जमीन तरी ओली ठेवायची होती ह्या सुप्त इच्छेने कवितेचा शेवट होतो.
कवयित्री जमीनीच्या वांझपणाबद्दल खंतते आहे की त्या दृष्टांताने स्वत:चे वांझपणाचे दु:ख काढते आहे हा संभ्रम मोठा धूसरपणे इथे पेरलेला दिसतो आहे. ( संभ्रमाला अंकुरायला कशाची ओल लागत नसावी, हे वाचकांचेच संचित म्हणायला हवे ! ). झाडे वाढलेली आहेत, शिवाय करपलेली आहेत, हाच त्यांचा बेहिशोबीपणा असावा. त्यांनी ह्या सगळ्या करपण्यात निदान पायाखालची जमीन तरी ओली ठेवायला हवी होती, हा सृजनाचा भरवसा देणारा आशावाद मात्र खूपच मोहक व बोलका आहे.
कवयित्री स्वत: शेतकी कामे करणारी आहे, का तिला शेतकर्‍यांच्या विश्वाचे सह-संवेदन आहे, हा तसा गौणच प्रश्न आहे. कवितेतले वांझपणाचे दु:ख व सृजनाची सूप्त आशा ह्या मात्र अगदी खुमासदारपणे साधलेल्या आहेत. कविता मुक्तछंदात असणे हे ह्या वृत्तीला पोषकच वाटते.

------------------------------------------------------------------------------------------------