सोमवार, १६ जून, २०१४

कविता म्हणजे

कविता म्हणजे
चंद्र आणि खेचर    ( कवी : दिलीप चित्रे )
चरतात एका फाळलेल्या माळावर
अंधार समजून गवत प्राणिमात्र ...
रात्रीत विरघळते माझे ढेकूळ
आसमन्त गढूळ करीत. पण मग स्वच्छ
होतात माझे डोळे पाहून उजळ
चंद्र आणि एक मुग्ध झालेले खेचर
स्वतःच्या सावलीवर ...
पाण्यात चांदण्याने रडलेलं अक्षर
मासोळीची लाटभर ओळ होऊन
पोह्तंय माझ्या गळक्या ढेकळाच्या
गढूळ आसमंतात ....अशी वेळ .
आणि गवत समजून स्वतःच्या सावलीचं
खेचर चांदणं चरतय ...
माझी माती बसते जाऊन रात्रीच्या तळाला
मासोळीच्या सुळकांडीची लाट पकडतो
प्रत्यक्ष अवकाशाचा गळ

चंद्र समजून मी पाहिलं
त्या मुग्ध खेचराचं चरणारं चांदणं.
------------------------------------------------------
लीम्बोणीच्या झाडामागचा चंद्र परिचित आहे पण खेचर ही काय भानगड आहे ? गाढव आणि घोडा ह्या प्रजातीतून निर्मिलेले  हे हायब्रीड जनावर . लष्करात ओझी वाहण्यासाठी वापरीत. माझ्या लहानपणी मी पाहिलेली खेचरं घोड्यापेक्षा दणकट असत आणि त्यांच्या पायावर केस असत. त्यांची शेपूट घोड्यापेक्षा जास्त झुपकेदार असे.  पण जे लोक घोड्यांची पैदास करतात ( रेसचे घोडे ) ते ह्या प्रजातीला खूप कमी लेखतात. त्याचा उल्लेख तिरस्काराने करतात.
तर अशा खेचरापैकी एक स्वतःच्या सावलीवरून स्वतःत मुग्ध झालेले आहे. स्वतःच्याच प्रतिमेत गुंग झालेले आहे. स्वतः कमजात असूनही स्वतःत मश्गुल झालेले आहे. हे म्हणजे आपलेच प्रतीक समजा. आपण आहोत गद्धेमजुरी करणारे पण आपण स्वतःलाच थोर समजतो आहोत.
तसे तर सगळेच प्राणीमात्र चरितार्थासाठी चरत असतात. दिवस आणि रात्र. अज्ञानाचा अंधार गवतासारखा चरात असतात. ह्या वैषम्यात कवीला अजूनही खालची जाणीव होते ती एक मातीचे ढेकूळ असल्याची. व हे ढेकूळ आजूबाजूचा आसमंतही प्रदुशित करते .
ह्या डीप्रेशन मध्ये जरा सुखाची बाब अशी की स्वतःत मश्गुल असलेले प्राणी ( जसे खेचर ) हे प्रणयी चांदणे चरत असतात.
स्वतःचे अस्तित्व अगदी ढेकळासारखे नगण्य असतानाही त्याच पाण्यातून वर उसळी घेणारी मासोळी ही जणू काही वरच्या अवकाशाने गळ टाकून वर खेचली आहे असे दिसते आहे. म्हणजे जे सुटकेच्या आशेने वर सुळकांडी घेतात तेही गळालाच लागलेले असतात.
तर अशा वेळी, मी काय पाहतो तर, स्वतःत मश्गुल झालेल्या माझे ( खेचराचे ) प्रणयात चरणे, चांदणं चरणे.

--------------------------------- 

शनिवार, १४ जून, २०१४



कविता म्हणजे
दिवे
काहीतरी कुजल्याचा वास याय लागला
अन मी खिशातनं रुमाल काढणार
तोच माझी करंगळी खाली पडली
ती मी दुसऱ्या हातानं उचलून घेतली
अन रुमाल नाकावर धरणार
तर नाकच निसटून रुमालात आलं
ते रुमालात गुंडाळून मी खिशात टाकलं

काहीतरी कुजल्याचा वास येतच होता
म्हणून खिशातल्या खिशात नाक मुरडलं
अन करंगळीत आळ्या पडल्यात की काय
ते बघणार ः पण तेवढ्यात दिवेच गेले

कवी -- अरुण कोलटकर.
कवीची पार्श्वभूमी, त्याच्या इतरत्र असलेल्या प्रतिमा वगैरे गोष्टींची आवश्यकता न मानता ह्या कवितेचा अर्थ लागणारा नाही का ? जे काही कवितेत लिहिलेय त्याचा काय होतो अर्थ ?
ज्यांनी महारोग्यांना जवळून पाहिलेय ( आजकाल हा रोग कमी झालाय पण जेव्हा ह्याचा प्रादुर्भाव होता तेव्हा प्रथम तोंडावर कानावर चट्टे येत असत. मग एकेक अवयव सडत जाई. विशेषतः बोटे आधी झडत असत. मग हात पाय असे अवयव जात. गॅन्गरीन झाल्यावर जशी बोटे, पाय कापावा लागतो तसेच महारोगात होते. बाबा आमटे ह्यांच्या आश्रमात तुम्ही काय काय वस्तू दान म्हणून घेता अशी विचारणा केली तर लोक सांगतात अहो एक चप्पल पण आम्ही घेतो, कारण आमच्या इथे बऱ्याच जणांना एकाच पाय असतो. असा हा भयंकर रोग आहे/होता. शिवाय हा संसर्गाने होतो अशा समजुतीने लोक अशा रोग्यांना शिवतही नाहीत. त्यामुळे महारोग झालेले रोगी एकाकी असणे अगदी संभवनीय.
तर अशा एका रोग्याने काही तरी कुजतेय त्याचा वास येतोय म्हटले तर त्याची परिस्थिती बरीच बिकट झालेली आहे हे कोणालाही कळावे. बोटे झडणे तर अगदी साहजिकच. त्यामुळे ह्याची करंगळी पडली तर त्यात काही असंभव वाटू नये. ह्या रोगात कशाचे वैषम्य वाटावे ? बोटे झडण्याचे का अवयव कुजून त्यांच्या वास येण्याचे इतकी ह्या रोगात परमावधी होते. त्यामुळे दुसऱ्या हाताने करंगळी उचलणाऱ्याला वास सहन न होऊन त्याने नाकाला रुमाल लावावा ह्यात केवढे कारुण्य ! शेक्सपियर जसे शेवटच्या अवस्थेचे वर्णन करताना “सॅन्स आईज, सॅन्स टीथ....” अशा एकेक अवयवाचे जाणे चितारतो तसे इथे ज्या नाकाला वास सहन होत नाहीय त्या नाकाचे जाणेही जवळ येतेच. आणि हे सगळे निर्विकार नजरेने त्याला पाहावे लागतेय. फार तर तो खिशातल्या खिशात त्यावर नाक मुरडू शकतो व मुरडतोही. महारोग्यांच्या शेवटल्या अवस्थेत जाखमात आळ्या पडतात व नंतर खेळच खलास होतो. त्यामुळे आसक्तीने आळ्या  पडल्या आहेत का ते पाहणे महारोग्याला भागच पडते . आणि ह्या आळ्या पाहण्यावर दिवे जाण्याने एक प्रकारे मेहेरबानीच होते. म्हणजे दिवे गेले ते बरेच ! मरणासन्न परिस्थितीतही आसक्तीचे हे असणे आणि त्यावर अनपेक्षित उतारा सापडणे हे मोठे काव्यमय वर्णन आहे. आसक्तीचा हा मरातब आहे का मरण्याचा हा महोत्सव आहे हे अनाकाल्नीयच राहते ते दिवे जाण्याने. असे दिवे गेले तर !

---------------------------------------------------

रविवार, १ जून, २०१४

दोन कविता, छे, दोन बायकी भूमिका
कविता-रती अनियतकालिकात आलेल्या ह्या दोन कविता पहा :
१)      कवितेच्या कळा   ( कवयत्री: संध्या रंगारी )
--------------------------
दाटून भरून आलय आभाळ,
मी शोधत होते मला, माझ्यातच
पण सापडत नाही मी, मलाच.
मी लिहू बघते कविता
उत्तररात्रीची,
गर्भातल्या प्रकाशाची.
तुफानातल सामर्थ्य अन सौंदर्यही
उतरतय इथ कागदावर
या नीरव शांततेत.
झरताहेत बोटातून शब्द,
ऐकू येतोय माझ्या आतला आवाज
अधिकच स्पष्ट
इतका की दचकते मी,
ऐकत तर नाही ना कोणी...?
दारात फुललीय रातराणी,
उरी वादळ .
मी रचतेय नवी सृष्टी,
माझ्याजवळ पल्याडची दृष्टी.
मी वेगळ्याच धुंदीत
शब्दांच्या मस्तीत
मी अवलिया
मस्तमौला फकीर.
घर एक लकीर.
कुशीवरून वळता वळता
म्हणतोस तू सहजच—
“बंद कर लाईट,
डोळ्यावर येतोय
झोपना
कोण वाचणारेय त्या थर्डक्लास कविता.
ही घृणा
उतरते आत.
चिरवेदना होऊन
साध उलट उत्तर न देणारी मी
बनते कवितेत रणरागिणी
अन चकितही होते,
हे माझ कोणत रूप.
कल्पनेतच जगून घेते
एक आयुष्य.
जागतेपणी त्याचे डंख
मिरवताही येत नाहीत
झाकताही येत नाहीत
हे ...हे ...असच अन अजून काहीतरी
सुचल होत आधीही; पण लिहिल नाही.
कुठे मिळतो बाईला
लिहिण्यासाठी असा खास वेळ
लेकराच्या रडण्यात वाहून गेली प्रतिभा
धुन्यासोबत धुवून टाकली स्फूर्ती,
केरवाऱ्यात टाकली कल्पना.
लादलेल्या गृहिणीपणात
पीठावर मारल्या रेघोट्या,
पोळ्या लाटता लाटता
निसटून गेल्यात कितीतरी ओळी,
करपले शब्द.
भाजीच्या फोडणीत टाकल्या मी कविता
अन कळली नाही तुला चव
चरकलेल्या तिखटाची.
लिहिता येईल नंतर
म्हणत उरकत गेले हातातल काम.
मग फुरसतीन ओढला कागद
तर मेले शब्द झाले वैरी.
दिवस कामात बुडालेला अखंड
अन रात्री लिहिण्यावर तुझी बंदी.
सत्तेची केंद्र मंत्रालयातच नसतात
घरातही असतातच की विखुरलेली.
बाईने व्यक्त व्हायचं ?
कस....कुठे ....?
उपेक्षेनेच मारलय मला
अन सतावलय प्रकाशकांनी
कागदाचा खर्च निघत नाही साधा.
खळबट करून वाढवलीत लेकर,
कविता कशी जगवायची ?
तरी रक्तातून वाहते
कविता शाईसारखी !
शाईतून रक्त पाण्यासारख !
काय जपू...?
कसं जपू ...?
स्त्रीत्व येतं आड.
पडतातच चारित्र्यावर धब्बे
      ही कोण...हिच्या कवितेतला
प्रियकर की सहचर ?
कल्पनेतला वाटत नाही
अन तुलाही माहीत पक्कं
तू ही नाहीसच खास.
माझ वस्त्रहरण...
लेखणीतूनही माझ्या बाईपणावरच चर्चा
जगण्याच्या टोकाला तू
मरण्याच्या टोकाला मी.
घरातच चाललय युद्ध
माझ्या लिहिण्यावरून.
केले जाताहेत हात कलम
ठरवून दिलेल्या विषयावरच,
लिहायचं म्हणत....
शब्द माझे शस्त्र,
पण आता मीच म्यान केलेले
कविता कुरुक्षेत्र
माझा होतो अर्जुन
हताश विवश
धनुष्य खाली ठेवणारा
पण
नकोय मला कुणी कृष्ण
गीता सांगणारा.
येत नाही
तत्वज्ञान जगता
तडजोडच करावी लागते शेवटी बाईला.
घर साम्भाळून घेत नाही मला.
अन इकडे
हव ते हव तस उतरत नाही कागदावर.
वाढते बेचैनी,
घेरून टाकत अस्वस्थपण,
कोरत जात भणंगपण,
कुरतडत राहत मीपण
भांडते मी कवितेशी---
“बये, समजून घे गं मला तू जराशी ”,
पण नाही
इथेही हारते मी
अन खरच सांगते
खूप जड जातंय ही हार पचवण,
स्वतःला सोलवटून घेत
हे कविता-बिविता करण
आई म्हणते,
“नुसता येडेपणा आहे ”
असं कवितेने कुठं बदलता येतं का जग ?
२)      आणि ही दुसरी कविता :
बिनदिक्कत  ( कवयत्री : दमयंती मोहन भोईर )

तू म्हणालास, “कर इथे सही !”
तर मी केली
न वाचता, न विचारता .
नवल वगैरे कसलं त्यात,
तू ऊठ म्हटल्यावर उठतेच ना,
आणि बस म्ह्टलस की बसते
आणि हो,
हा मी दाखवलेला विश्वास तुझ्यावर
या भ्रमात राहशील !
तर तसं नक्कीच नाही.
तू करवून घेतलेल्या कवायतीमधून
कुठल्याही प्रसंगाला तोंड देण्याईतक्या
कमावलेल्या सामर्थ्यावर
मी बिनदिक्कत ठोकलीय सही !
----------------------------


































पहिला कवितेत बाईपणाची खंत आहे, कवितेत योग्य भाव न येण्याची खंत आहे, नवऱ्याच्या वरचढपणाची खंत आहे, कवितेच्या अंमल नसण्याची खंत आहे. एकूणातच ही एक खंत-कविता आहे. अर्थात कवयत्रीला आपली खंत व्यक्त करण्याचा अधिकार आहेच व ही खंत तिने छांन व्यक्त केलेली आहे.
त्याच बरोबर दुसऱ्या कवितेत खंतीपेक्षा स्वतःवरचा विश्वास जास्त आहे. तुला तोंड देण्याचे माझे सामर्थ्य आहे व त्या जोरावर मी बिनदिक्कत सही करते आहे असे इथे कवयतरी म्हणत आहे. गंमत म्हणजे दोन्ही कवयत्री आहेत व त्यांच्या भांवना किती वेगवेगळ्या आहेत. एक भावना टिपिकल बायकी आहे तर दुसरी स्वत्वाची जाणीव असलेली आहे !

------------------------------------------------

बुधवार, १८ डिसेंबर, २०१३

---------------------
प्रथमपुरुषी एकवचनी
( भालचंद्र नेमाडे यांच्यासाठी )..............कवी : दासू वैद्य ( कविता-रती, दिवाळी २०१३ मधून )
-----------------------------------------------------------------
प्रथमपुरुषी
एकवचनी,
वणवण भटकला,
प्रत्येकाने हटकला,
जमेल तिथे स्पष्टीकरण
शक्य तिथे तुष्टीकरण.
राहिला चालत,
आवरेना सुसाट सुटलेलं कथानक
मानवेना रचनेची परंपरा
उपकथानकातल्या अनपेक्षित घटना
घुटमळू लागल्या पायांत,
अगम्य हेलकाव्यांनी
हिंदकळू लागलं अस्तित्वाचं पाणी,
आधार म्हणून कधी ओढ म्हणून
बिलगत गेला एकेका नात्याला.
अडकला पात्रांच्या दाट जाळीत
पसरला जलरंगासारखा भाषेमधून,
कथानकाची गाडी
शेवटच्या स्टेशनात येऊन थांबल्यावर
चाचपले त्याने स्वत:चे खिसे,
खिशात सापडलेल्या
तिकिटावरच्या गावाची अक्षरं
स्टेशनवरच्या नावाशी
किंचितही नव्हती जुळणारी.
तरीही उत्सवी लोक होतेच बाहेर
स्वागताला उत्सुक,
उद्‌घोषणांच्या गोंगाटात
लोक वाजत-गाजत घेऊन गेले
यशस्वी कथानकाला,
प्रथमपुरुषी एकवचनी
शोधू लागला स्टेशनबाहेर
टॅक्सी, रिक्षा, टांगा
इप्सित स्थळी पोचण्यासाठी.

----------------------------------------------
कवितेच्या शीर्षकाखाली कंसात "भालचंद्र नेमाडे यांच्यासाठी" असे लिहून कविता करण्याची ही जुनी परंपरा पुनरुज्जीवित करण्यासाठी श्री. दासू वैद्य ह्यांचे अभिनंदनच करायला पाहिजे. एकेकाळी कवियत्री इंदिरा संत ह्यांनी "केशराचा मळा" ह्या शीर्षकाची कविता श्री. ना.सी. फडके ह्यांच्यावर केलेली मला चांगलीच आठवते. ही जुनी पद्धत असली तरी एका कवीवर, साहित्यकावर कवितेतून केलेली ही अप्रतीम अशी समीक्षा म्हणता येईल.
नेमाडेंना ज्या गावी जायचे होते तिथे ते पोचले नाहीत आणि तरीही लोक त्यांचे स्वागत, उद्‌घोष करीत आहेत असे निष्कर्षाचे वाक्य ह्या कवितेत मोठे कळीचे आहे. नेमाडेंचे सुरुवातीचे लेखन पाहता त्यांना समीक्षेच्या गावी जायचे होते असे कोणालाही वाटते. पण त्यांनी नंतर केवळ कादंबरीची कास धरली व ते भलत्याच गावी पोचले असे कवीला वाटत असावे. किंवा पुरस्कारांच्या भाषेत बोलायचे तर नेमाडेंनी बहुदा "तिकीट" काढलेले गाव "ज्ञानपीठ"चे असावे व ते पोचले फक्त "साहित्य-अकादमी"ला, असाही सूर वरील कवितेतून जाणवू शकतो. अर्थात इथे "ज्ञानपीठ" ऐवजी नेमाडे "नोबेल"चेही तिकिट काढते तरी पोचलेल्या गावी त्यांचा सत्कारच होता. इथे दासू वैद्य समीक्षेच्या पद्धतीने हे दाखवू इच्छित आहेत की त्यांनी जी "प्रथमपुरुषी-एकवचनी" अशी कादंबरीतून शैली अवलंबिली, ( आत्मकथा व काल्पनिक कादंबरी ह्यांचे मिश्रण केले ), त्याने त्यांच्या उपकथानकातल्या पात्रांशी बरेच घोटाळे झाले, त्यांच्या अस्तित्वाचं पाणी ( पोटातलं ) हिंदकळू लागलं. तसेच दासू वैद्य नेमाडेंना त्यांच्या कादंबरीतल्या भाषासौष्ठवासाठीही दाद देत आहेत ते "पसरला जलरंगासारखा भाषेतून"  असे म्हणत. हे अप्रतीम भाष्य समीक्षेच्या प्रांतात गद्यात अशक्यच झाले असते इतके ते इथे काव्यमयरीतीने अवतरले आहे.
नेमाडे "हिंदू" ही कादंबरी, तीन भागात ( अशी त्यांची जाहीरात होती ) आणि गेली ३०/३५ वर्षे लिहीत होते ह्या सृजन-उन्हाळीवर दासू वैद्य अशी टिप्पणी करीत आहेत की "आवरेना सुसाट सुटलेलं कथानक, व मानवेना रचनेची परंपरा !". ही मोठी मार्मिक टिप्पणी असून ते नेमाडेंच्या आवाक्यावर भाष्य करणारे आहे.
जसे परंपरेने आपण घेतलेला वसा टाकत नाही तसेच कदाचित नेमाडे जी शैली ( प्रथमपुरुषी-एकवचनी ) आजही टाकत नाहीत त्यावर दासू वैद्य म्हणत आहेत की शेवटच्या स्टेशनावर पोचल्यावरही ह्या लेखकाला अजूनही टॅक्सी, रिक्षा, टांगा यासारखे एखादे वाहन इप्सित स्थळी पोचण्यासाठी शोधावे लागत आहे. हे एकप्रकारे प्रत्येक लेखकाचेच भागधेय असल्यासारखेही आहे.
कवितेतून समीक्षा करण्याचा हा अनोखा प्रकार आहे आणि त्यात श्री.दासू वैद्य यशस्वी झाले आहेत असेच म्हणावे लागेल.
-----------------------------------


मंगळवार, १७ डिसेंबर, २०१३

...सगळं अंग ठसठसून येत असतं,
तरी, छायडाबाई सुरेभान लांडगे,
तांबडं फुटायच्या आत उठते.

परसाकड जाऊनयेऊन, आंघोळपांघोळ उरकून,
धबाधब साताठ भाक-या थापटून,
डेचकीत कायतरी कालवण उकळून,
सुरेभानला 'च्या' देते, पोरीला खायला घालते.

फडक्यात दुट्टं बांधून पाटीत टाकते,
च्येपल्या पायात सरकवून, पोरीला कमरेवर घेऊन,
झपाझप वावराकडं निघते.

दिवसभर वावरातल्या उस्तवारी करून,
तिसराकपारा जळण सावडीत,
बांधाबांधाने, काट्याकुट्यातून हिंडते,
मोळी बांधते, जळण चुंबळीवर, कमरेवर पाटी,
एका हातानं जमेल तसं पोरीचा हात धरून,
त्राण त्राण गोळा करत, घराकडं.
दिवाबत्ती, सैपाकपानी, पोरीला खाऊ घालते.

सकाळी तालुक्याला कशाला कायनु गेलेला
सुरेभान सयाजी लांडगे, झाकड पडताना माघारा येतो,
झिंगलेला, कोलमडत,
उंब-याला अडखळून धबाकदिशी नाकावर आदळतो,
छायडाबाई भेदरून उठते, सुरेभानला उठवते,
हाताला धरून, कुडाला टेकून बसवते.
पाण्याचा गलास भरून आणते,
गलास हातात घेता घेता, सुरेभान,
कशासाठी कुणास ठाऊक,
एक जोरकस बुक्की
तिच्या गालाच्या आसपास ठेऊन देतो,
“आयघाल्ये..तुह्या मायचा...”
कशासाठी कुणास ठाऊक,
घंटाकभर शिव्यांची फैर चालू ठेवतो,
दमून जातो, छायडाबाई कळ सोसते,
परातीत भाकरीच्या कोरा, ठेचा, कालवण वाढते,
सुरेभानच्या पुढ्यात ठेवते,
सुरेभान अचकटविचकट बोलतो, आणि,
अद्वातद्वा खातो, खातो त्यापेक्षा जास्ती सांडतो,
छायडाबाई परात उचलते, खरकटं वारते,
सतरंजी टाकून देते सुरेभानला,
मध्ये पोरीला टाकून, पोत्यावर आपण पडते.

कधीतरी सुरेभान उठतो, जवळ येतो,
खस्स्कन छायडाबाईला जवळ ओढतो,
छाती कुस्करतो, मिनिटभर,
जमेल तेवढा आत शिरतो. कलंडतो.

छायडाबाई, उन्मळून येणारे कढ आतल्याआत दाबते,
सगळी ठसठस दाबून घेते आतल्याआत.
आढ्याकडं रखरखा बघत जन्माचा धांडोळा घेते,
जमेल तेवढा.  थकून तिचा डोळा लागतो.
...सगळं अंग ठसठसून येत असतं,
तरी, छायडाबाई सुरेभान लांडगे,
तांबडं फुटायच्या आत उठते...
------------------------------------------------------
- बालाजी सुतार, अंबाजोगाई.

-----------------------------------------
---------------------------------------------
वरील कवितेची एक भाषाशास्त्रीय दखल !
----------------------------------------
१) छायडाबाई---"स्त्री ही पुरुषाची छाया असते", असे कोणी छायडाबाईला समजेल तर ह्या नावातल्या "छा" मुळे नावाला तिरस्कार, तुच्छता येते असेही कोणाला वाटेल. ( वाटल्यास हेच नाव छा ऐवजी इतर अक्षरे बदलून ठेवा. जसे: कायडाबाई, खायडाबाई, गायडाबाई...केवळ छायडाबाईलाच तुच्छता येईल !)
२) पुनरावृत्त शब्द वापरल्याने भाषा ठसकेदार होते हे खालील शब्दांनी सिद्धच होते : ठसठसून ; जाऊनयेऊन ; आंघोळपांघोळ ; काट्याकुट्यातून ; बांधा बांधाने ; दिवाबत्ती ; सैपाकपानी ; त्राण त्राण ; कशाला कायनु ; अचकट विचकट ; अद्वातद्वा ; आतल्या आत;
३) ध्वन्यानुकारी शब्दांमुळे शब्दचित्रे उमटतात : जसे : धबाधबा ( ह्यात भाकरी करतानाचा आवाजच ऐकू यावा ) ; धबाकदिशी ; 
रखारखा बघत;
४) काही ग्रामीण शब्दांमुळे नवीन शब्द ऐकल्यासारखे वाटते : जसे : चपला ऐवजी च्येपल्या ; दुटटं बांधून ; चहा ऐवजी च्या ; तिसराकपारा ( ह्या बहुदा काडया असाव्यात ) ; झाकड पडताना ( हे झापड सारखे वाटते किंवा सायंकाळचा शब्द असावा ) ; खरकटं वारते ( वारणे म्हणजे सारणे ) ; जन्माचा धांडोळा ( लुकिंग बॅक ऑन लाइफ ) ;
५) काही शब्द त्यांच्या अर्थापेक्षा बरेच सांगून जाणारे आहेत : जसे : जमेल तेवढे आत शिरतो ; जळण चुंबळीवर ( बाई मोळी डोक्यावर घेऊन चालली आहे, चुंबळीवर असे चित्र कोणालाही दिसावे ! ); लांडगे हे आडनाव मोठे समर्पक वाटते !
६) परिणामकारकता : साधण्यासाठी सुरुवातीच्या ओळी परत शेवटी देण्याने हे रहाटगाडगे कसे फिरते आहे ते चक्क जाणवते !
------------------