मंगळवार, १२ जानेवारी, २०२१

 ज्ञानेश्वरांची एक विरहिणी : मनाला बुद्धीचा विरह 

सुख शेजारी असता कळी जाली वो पहाता |

देठु फेडुनि सेवता अरळ केले ||१||

अंगणीं कमळणी जळधरू वोले वरी |

वाफा सिम्पल्यावरी वाळून जाये ||२||

मोतियाचे पाणी वाहे निळिये सारणी |

सगुणाची लावणी लाऊनि गेला ||३||

अंगणीं वोळला मोतें वरुषला |

धन्य दिवसु जाला सोनियाचा ||४||

चोरट्या मधुकरा कमळीं घेतलासे थारा |

मोतियांचा चारा राजहंसा ||५||

अंगणीं बापया तू परसरे चांपया |

असुवी माचया भीनलया ||६||

वाट पाहे मी एकली मज मदन जाकळी |

अवस्था धाकुली म्हणो नये ||७||

आता येईल म्हूण गेला वेळु का लाविला |

सेला जो भिनला मुक्ताफळीं ||८||

बावन चंदनु मर्दिला अंगीं वो चर्चिला |

कोणे सदैवे वरपडा जाला वो माये ||९||

बापरखुमादेविवरू माझे मानसींचा होये |

तयालागीं सये मी जागी सुती ||१०||

-------------------  

प्रेयसीला प्रियकराचा विरह ( आय मिस यू, नो !) व्हावा, त्यात तिला त्याची सारखी आस लागावी, ह्या ढोबळ भावनेला ज्ञानेश्वरांनी “विरहिणी” ह्या प्रकारात असे उंच नेवून ठेवले आहे की तिथे “भक्ताला देवाची आस लागणे” त्यांना आपल्याला दाखवून द्यायचे आहे. तसेच ह्या विरहिणीत त्यांना “मनाला बुद्धीची आस” लागलेली दाखवून द्यायचे आहे.

पाण्याचे सुख जवळच असल्याने, जरा दाट असलेले कमलिनीचे देठ मृदू ( अरळ ) होउन त्याची कळी झाली आहे. अंगणी कमळीणीवर पाणी ( जळधरू मधले ) पडून ते तिला भले ओले करते आहे ( जसे भावना “मना”ला चिंब करत असते ), पण तेच पाणी शिंपल्यावर पडल्याने तो त्यात मोती तयार करतो. ( जसे शिंपल्यात “बुद्धी”रूपी मोती  पाण्यातून तयार होतात ). निळी सारणी ( उताराकडे पाणी वाहते/सरते, त्यावरून तयार होते सारणी. मोटेचे पाणी कसे उताराकडे येते व त्यात फेसाने मोतीच आहेत असे दिसते.) हे निर्गुण रूपी मोती वाहून आणते आणि सगुणांची पेरणी/लावणी करून जाते. अशा मोत्यांचा अंगणात वर्षाव झाल्याने आज “सोनियाचा दिनु” वाटत आहे. चोरट्या भृन्गांना कमलिनीरूपी मनाचा थारा जरूर असतो, पण जे राजहंस आहेत त्यांना बुद्धिरूपी मोत्यांचा चारा मिळतो. अंगणी पसरलेल्या हे चांफ्या, मी विरहिणीअसून  माझ्या आसवांनी माझा पलंग भिजला आहे. मी ह्या मदनरूपी प्रियकराच्या विरहाने जळत आहे व ही अवस्था काही कमी लेख्ण्यासारखी नाहीय. आत्ता येतो म्हणून गेलेला प्रियकर वेळ लावतो आहे व त्याने माझा शेला आसवांनी भिजून गेला आहे. हा दाह कमी व्हावा म्हणून अगदी बावनकशी चंदनाचा लेप लावला पण हा प्रियकर दुसरीलाच तर प्राप्त झाला की काय ? नाही, नाही, हा बापरखुमादेवीवरू हा माझाच स्वामी आहे, कमळरूपी माझ्या मनाला मोतीरूपी बुद्धीचा विरह जडावा म्हणून मी जागी राहते आहे !

मनाचे भावण्याचे जे देखणेपण आहे, ते इथे ज्ञानेश्वरांनी बुद्धीच्या विरहाला जोडून उदात्त केलेले आहे. 

----------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा